मुस्लिम-मराठा समाजाला आरक्षण द्या; नसीम खान यांची केंद्राकडे मागणी

प्रतिनिधी, मुंबई : केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन होत आहे. या एनडीए सरकारमधील घटक पक्ष असलेल्या आंध्र प्रदेशातील तेलुगू देसम पक्षाने मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यास कट्टीबद्ध असल्याचे स्पष्ट केलेले आहे. जर आंध्र प्रदेशात मुस्लिम समाजाला आरक्षण देता येते तर त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही ते दिले पाहिजे, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना नसीम खान म्हणाले की, मागासलेपणाच्या आधारावर त्या – त्या समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे-पाटील हे लढा देत असून त्यांची मागणी योग्यच आहे. मराठा, धनगर आणि मुस्लिम समाजाला मागसलेपणाच्या आधारावर आरक्षण दिले पाहिजे.
Kolhapur News : ‘सुजल्यावर कळतंय शरद पवारांनी मारलंय कुठं…’; कोल्हापुरातील हटके बॅनरची राज्यभरात चर्चा
तेलुगू देसम पक्ष हा भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचा घटक पक्ष आहे आणि या पक्षाने मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे. आंध्र प्रदेशात जसे मुस्लीम आरक्षण दिले जाऊ शकत असेल तर महाराष्ट्रातही दिले पाहिजे.

केंद्रात भाजपाचे सरकार आहे आणि राज्यातही सरकार आहे. त्यासाठी आता तातडीने आरक्षणचा कायदा करावा. २०१४ साली काँग्रेस आघाडी सरकारने मराठा आणि मुस्लीम समाजाला आरक्षण दिले होते, मुस्लीम आरक्षणावर मा. उच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले होते, याची आठवण नसीम खान यांनी करुन दिली.
Jalgaon News : मटा इम्पॅक्ट! जळगाव रामदेववाडी अपघात प्रकरण; पाठपुराव्याला यश, मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत सुपूर्द
आरक्षणावरील ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी तसेच जातनिहाय जनगणना करावी अशी भूमिका काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी मांडलेली आहे, त्याप्रमाणे सरकारने कार्यवाही केली तर जे समाज आरक्षणाची मागणी करत आहेत त्यांना आरक्षण देणे सोईचे होईल, असेही खान म्हणाले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. ९ जून रोजी संध्याकाळी त्यांचा शपथविधी पार पडेल. लोकसभा निवडणूक २०२४ च्या निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत न मिळाल्याने आता त्यांना एनडीए मित्रपक्षांवर अवलंबून राहावं लागलं आहे.