मुंबई – पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, कंटेनर कारवर पलटी, पती-पत्नीचा जागीच मृत्यू

अमुलकुमार जैन, मुंबई (अलिबाग) : खंडाळा बोर घाटात जुन्या मुंबई – पुणे राष्ट्रीय महामार्गावर बॅटरी हिलजवळ एक कंटेनर आणि कारच्या दरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातात कारमध्ये बसलेल्या दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर पुण्याच्या दिशेने येणाऱ्या कारवर पलटल्याने हा अपघात झाला आहे.लोणावळ्याकडून जुन्या मुंबई – पुणे महामार्गाने मुंबईकडे जात असताना वाघजाई मंदिराच्या पुढे बॅटरी हिल परिसरात या रस्त्याला तीव्र उतार आणि वळण आहे. याच ठिकाणी रात्री १० वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर (एम.एच.१४ एफ.टी. १४४५) हा समोरून येणाऱ्या कारवर (एम.एच.१४ बी.एक्स.१६०५) पलटला. प्राथमिक माहितीनुसार सदर कार ही अलिबाग वरून तळेगाव, मावळ या दिशेने निघाली होती. या कारमधून तळेगाव येथील रहिवासी असलेल्या चौधरी कुटुंबातील आठ जण प्रवास करत होते. अपघातात कविता दत्तात्रय चौधरी आणि दत्तात्रय चौधरी या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर योगेश चौधरी (वय ४०), जान्हवी योगेश चौधरी (वय ३१), दिपांशा योगेश चौधरी (वय ९), जिगिशा योगेश चौधरी (वय १.५), मितांश दत्तात्रय चौधरी (वय ९) आणि भूमिका दत्तात्रय चौधरी (वय १६) हे सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जवळच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
Raghuram Rajan: ‘…तिसरी अर्थव्यवस्था खरा मुद्दाच नाही’, अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर माजी RBI गव्हर्नर वेगळ्याच चिंतेत

अपघाताची बातमी मिळताच अपघातग्रस्तांच्या मदतीला या बचाव पथकाचे सदस्य, महामार्ग पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिक तरुणांच्या मदतीने बचाव कार्य सुरू केले आणि सर्वप्रथम कारमध्ये अडकलेले सर्व जखमी तसेच दोन्ही मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर क्रेनच्या मदतीने सदर अपघातग्रस्त कार रस्त्यावरून बाजूला केली.