मुंबई-ठाण्यात पावसाचा जोर वाढला, मध्य रेल्वेवर वाहतूक उशिराने, रस्ते वाहतूकही मंदावली,

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात बुधवारी रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, वसई, पालघर भागातही पाऊस सुरु आहे. रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचलं आहे. मध्य रेल्वेवरील वाहतूक १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहे. तर पश्चिम आणि हार्बर रेल्वेवरील वाहतूकही काहीशी मंदावली आहे. पुढील तीन ते चार तास पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हवामान विभागाने गुरुवारी मुंबई आणि परिसरात येलो अलर्ट दिला असून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला होता. मुंबईत बुधवारी रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरु होती. त्यानंतर मध्यरात्री पावसाचा जोर वाढला.

गुरुवारी पहाटेही पाऊस सुरुच असल्यामुळे काही सखल भागात पाणी साठण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी रस्ते वाहतुकीचा वेगही संथ झाला आहे. तर मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल रेल्वेही मंदावली आहे.

कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या दहा ते पंधरा मिनिटे उशिरा धावत असल्यामुळे मध्य रेल्वेवरील अनेक रेल्वे स्थानकांवर आणि प्रवाशांची गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे.

सकाळी आठ वाजताच्या सुमारास

मध्य रेल्वेवरील वाहतूक १० ते १५ मिनिटं उशिराने
पश्चिम रेल्वेवरील वाहतूक ५ ते १० मिनिटं उशिराने
हार्बर रेल्वेची वाहतूकही ५ ते १० मिनिटं उशिराने

दुसरीकडे, दादर पूर्व भागात रेल्वे स्थानकाजवळ पाणी साचल्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली आहे. तर माटुंगा-सायन किंग्ज सर्कल येथील गांधी मार्केट परिसरात पाणी साठल्यामुळेही अनेकांना गैरसोयीला सामोरं जावं लागत आहे.
Central Railway Timetable : ऑगस्टपासून मध्य रेल्वेचं नवं टाईमटेबल, प्रवाशांना दिलासा, रोज १० दादर लोकल

रस्ते वाहतुकीचे अपडेट्स

पूर्व दृतगती मार्गावर पावसामुळे दृश्यमानता घटली, रस्ते वाहतूक संथ, वाहन चालकांना काळजी घेण्याचं आवाहन
पश्चिम दृतगती महामार्गावरही वाहतूक मंद गतीने सुरु
पूर्व मुक्त मार्ग (ईस्टर्न फ्री वे), सांताक्रुझ चेंबुर लिंक रोड (एससीएलआर) वरील वाहतूक सुरळीत
जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरील वाहतूक धीम्या गतीने, एलबीएसवर अनेक ठिकाणी साचले पाणी