मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट, कोकणात धो-धो, मराठवाडा-विदर्भातही जोरदार पाऊस, IMD चा इशारा

मुंबई: राज्यात मुसळधार पाऊस बरसतो आहे. कोकणात तर पावसाने धुमशान घातलं असून रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. कोकणाच्या दिशेने जाणाऱ्या आणि येणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. नदी-नाले तुडुंब भरुन वाहत आहेत, पूरसदृशस्थिती असल्याने प्रशासन अलर्टवर आहे. तर मुंबईतही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज दुपारनंतर राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यासाठी पावसाचा अलर्टही जाही करण्यात आला आहे.

पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अधूनमधून जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. यादरम्यान कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३० अंश सेल्सियस आणि २५ अंश सेल्सियसच्या आसपास असेल.
Mumbai Rains: मुंबईकरांनो सावधान! पुढील २४ तास पावसाचे, अतिमुसळधार पाऊस बरसणार, वाचा Weather Report
मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकण व्यतिरिक्त मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी धाराशिवमध्ये काही ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भातील नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, अकोल्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (४०-५० किमी प्रतितास वेग) आणि मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट

मुंबईसह उपनगराला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सकाळपासून मुंबईत पावसाची रिपरिप सुरु आहे तर दुपारनंतर पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता आहे. तसेच, कोकणातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरीच्या खेड येथे ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे, त्यामुळे जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये पावसाचं पाणी शिरलं आहे.

तर, पावसाचा फटका रेल्वेलाही बसला आहे. रेल्वे रुळावर माती आल्याने कोकण रेल्वे ठप्प पडली आहे. त्यामुळे काही गाड्या पर्यायी मार्गाने वळवण्यात आल्या आहेत, तर काही रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला आहे, सायंकाळी ५ वाजेपर्यंत स्थिती पूर्वपत करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं कोकण रेल्वे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी सांगितलं आहे.