मला मोकळं करा! फडणवीसांचा दिल्लीला कॉल; शहांकडून महत्त्वाचा निरोप, महायुतीत नवी घडामोड?

मुंबई: मला सरकारमधील जबाबदारीतून मुक्त करा. पक्ष संघटनेत काम करु द्या. संघटनेतील उणिवा दूर करतो, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी काल उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. राज्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला. भाजपच्या जागा २३ वरुन ९ वर आल्या. त्या अपयशाची जबाबदारी घेत फडणवीसांनी पक्षाकडे सरकारमधील जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी केली. त्यानंतर आज फडणवीस दिल्लीत जाणार आहेत.

पत्रकार परिषद घेत जबाबादारीतून मुक्त करण्याची विनंती करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे नेते अमित शहांना फोन केला. फडणवीस यांनी त्यांची भूमिका शहांकडे मांडली. शहांनी त्यांची बाजू ऐकून घेतली. तुम्ही दिल्लीत या. प्रत्यक्ष भेटून बोलू, असा निरोप शहांनी फडणवीस यांना दिला. देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाणार आहेत. तिथे ते शहांची भेट घेतील.
Lok Sabha Election Result 2024: महायुतीची पिछेहाट, पण भाजपचा मंत्री सुसाट; १००% स्ट्राईक रेट, ३ जागांवर यश, पक्षाची लाज राखली
शिंदे सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस समन्वयकाची भूमिका बजावतात. तीन पक्षांच्या महायुतीतही त्यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यामुळे महायुतीमधील राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं फडणवीसांनी सरकारमध्येच राहावं अशी भूमिका घेतली आहे. भाजपचे आमदार, नेते, पदाधिकारी यांचीही भूमिका तशीच आहे. आज सकाळीच फडणवीसांच्या सागर बंगल्यावर भाजपचे अनेक नेते पोहोचले. त्यांनी फडणवीसांच्या मनधरणीचा प्रयत्न केला.

फडणवीसांचा मुक्काम आज दिल्लीत असेल. उद्या भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक होईल. त्या बैठकीला फडणवीस उपस्थित असतील. दिल्ली दौऱ्यात ते अमित शहांसोबतच नरेंद्र मोदींची भेट घेतील. या बैठकीत लोकसभा निवडणूक महायुतीच्या खराब कामगिरीवर भाजप्या अपयशावर चर्चा होईल. राज्यात फडणवीसांची भूमिका काय असेल हे याच बैठकीत स्पष्ट होईल.