मध्यरात्री पत्नीनं गळफास घेतला, नंतर पतीनेही संपवलं जीवन, नवदांपत्याच्या अचानक जाण्यानं गावात खळबळ

सांगली: मिरज तालुक्यातील आरग गावामध्ये नवदांपत्यानी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सुनील पोपट कोळी (२५) आणि निकिता मिलिंद कांबळे (२३) असं आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. आठच दिवसांपूर्वी त्यांनी आरग येथे भाड्याच्या खोलीत राहण्यास आले होते. मृतांच्या पार्थिवावर मिरजेच्या शासकीय रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यात येत आहे. याबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. आत्महत्या करण्यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
Solapur Factory Blast : फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, आजूबाजूच्या परिसराला देखील हादरे; लाखोंचे फटाके जळून भस्मसात

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, सुनील पोपट कोळी आणि निकिता मिलिंद कांबळे हे नवदांपत्य आरग येथील एका भाड्याच्या खोलीत वास्तव्यास होते. मृत सुनील पोपट कोळी हा वाळवा तालुक्यातील बिचुद या गावातील रहिवासी असून तो ड्रायव्हर होता. तर मृत निकिता मिलिंद कांबळे ही पलूस तालुक्यातील मोराळे गावातील आहे. मागील सहा महिन्यापूर्वी या दोघांनी प्रेम विवाह केला होता. आई-वडिलांच्या संमतीशिवाय विवाह केल्यामुळे तेव्हापासूनच दोघेही भाड्याच्या खोलीत राहत होते. आठ दिवसांपूर्वीच दोघेही आरग येथे राहण्यास आले होते.

या दोघांचा संसार सुरळीत सुरू होता. मात्र एका रात्री निकिताने गळफास लावत आत्महत्या केली. त्यानंतर काही वेळातच सुनीलने त्याच ठिकाणी गळफास लावून आपलं जीवन संपवलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या दोघांच्या आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.