भुशी डॅमवर पाच जणांचं कुटुंब संपलं, नाना पटोले भडकले, पर्यटकांच्या सुरक्षेवरुन सरकारला घेरलं

मुंबई : लोणवळा येथील भुशी डॅम परिसरात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू होण्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. ही पहिलीच घटना नसून अशा घटना पावसाळ्यात वारंवार होत आहेत, मात्र अशा दुर्घटना होऊ नयेत, म्हणून राज्य सरकारने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी काय व्यवस्था निर्माण केली आहे? असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत विचारला.

नाना पटोले काय म्हणाले?

पावसाळ्यात लोणावळ्याप्रमाणेच राज्याच्या इतर भागातही पर्यटक मोठ्या संख्येने भेटी देत असतात. पावसाळ्यातील पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने राज्य सरकारने काय उपाययोजना केल्या आहेत, ते सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी पटोलेंनी केली. विधिमंडळात स्थगन प्रस्ताव मांडत नाना पटोले यांनी भुशी डॅम दुर्घटनेकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले.
Pune Bhushi Dam : लग्नासाठी आग्य्राहून आले, पावसात भुशी डॅमचा मोह, वाहून गेलेल्या कुटुंबाचे शेवटचे क्षण कॅमेऱ्यात

मोघम उत्तरं नकोत

राज्याच्या इतर भागातील धरणांवरही पर्यटक पावसाळ्यात भेटी देत असतात. अशा दुर्घटना वारंवार होत असतानाही सुरक्षेकडे लक्ष दिले जात नाही. सुरक्षा देऊ, उपाययोजना करु, अशी मोघम उत्तरं नकोत, तर सरकार नेमक्या काय उपयायोजना करत आहे, यावर स्पष्ट भूमिका घ्या, असं नाना पटोले म्हणाले.

आझाद मैदानावर अन्यायग्रस्त लोक आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. तेथेही चिखल आहे, कुठल्याही सोयी सुविधा नाहीत, आता सरकार तिथेही एखादी दुर्घटना होण्याची वाट पाहत आहे का? लोकांच्या समस्यांकडे राज्य सरकार गांभीर्याने पाहतच नाही, अशा शब्दात पटोलेंनी संताप व्यक्त केला.
Bhushi Dam : लहान पोरं वाहून गेली, सापडत नाहीयेत; भावाचा थरथरत फोन, मीही हादरलो पण… नातेवाईकाने सांगितला थरार

पवईतील कुटुंबांवरुनही धारेवर

दरम्यान, पवईतील जयभीम नगर येथील ६५० मागासवर्गीय कुटुंबे आजही पावसाळ्यात रस्त्यावर राहत आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिलेले असतानाही अद्याप कुटुंबं उघड्यावरच आहेत. सरकार बिल्डरांसोबत असेल तर त्यांनी तसे सांगावे. देशाच्या आर्थिक राजधानीच्या शहरात जर लोक किड्या मुंग्यांसारखे रहात असतील तर ते योग्य नाही. विधानसभा अध्यक्षांच्या आदेशाचंही पालन सरकार करत नसेल, तर ही मोठी गंभीर बाब आहे, असं पटोले म्हणाले.