भाजप गेमचेंजर निर्णय घेणार? अजितदादांची चिंता वाढणार, शिंदेसेनेसाठीही धोक्याची घंटा

मुंबई: लोकसभा निवडणुकीत महायुतीची कामगिरी सुमार झाली. राज्यात गेल्या निवडणुकीत ४१ जागा जिंकणाऱ्या एनडीएला यंदा केवळ १७ जागा जिंकता आल्या. मागील निवडणुकीत २३ जागा जिंकणारा भाजप आता अवघ्या ९ जागांवर विजयी झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र भाजपमध्ये चिंतन सुरु आहे. आज मुंबईत भाजपची महत्त्वाची बैठक सुरु आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह प्रमुख नेते, पदाधिकारी बैठकीला हजर असतील.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र असलेल्या ‘ऑर्गनायझर’नं भाजप-राष्ट्रवादीच्या युतीला लक्ष्य केलं. अजित पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये आल्यानं भाजपच्या ब्रँड व्हॅल्यूला धक्का लागल्याचा उल्लेख ऑर्गनायझरमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखात आहे. भाजप आणि शिंदेसेनेकडे सत्ता टिकवण्यासाठी आवश्यक संख्याबळ असताना राष्ट्रवादीला सोबत घेण्याची काय गरज होती, असा सवाल ऑर्गनायझरमधून उपस्थित करण्यात आला आहे.
भाजप दादांची साथ सोडण्याच्या तयारीत? क्रोनोलॉजी ‘ऑर्गनाईज्ड’; फक्त ‘मेसेज’चं टेन्शन
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीमुळे महायुतीला फटका बसल्याचं निरीक्षण ऑर्गनायझरनं नोंदवलं आहे. विशेष म्हणजे ऑर्गनायझरमधून करण्यात आलेली टीका भाजपच्या कोणत्याही नेत्यानं खोडून काढलेली नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर टीका होत असताना भाजपचा एकही नेता बचावासाठी पुढे आलेला नाही. त्यातच आयएएनएस वृत्तसंस्थेनं भाजप विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याची चाचपणी करत असल्याचं वृत्त दिलं आहे. त्यासाठी भाजपकडून अंतर्गत सर्व्हे केले जात आहेत. एकला चलो रेची भूमिका घेतल्यास कितपत फायदा तोटा होऊ शकतो याचा अंदाज भाजपकडून घेतला जात आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपनं २८ जागा लढवून ९ जागांवर यश मिळवलं. शिंदेसेनेनं १५ जागा लढवून ७ जागांवर विजय मिळवला. तर राष्ट्रवादीला ४ जागा लढवून केवळ एका जागेवर यश मिळालं. शिंदेसेनेचा स्ट्राईक रेट भाजपपेक्षा चांगला आहे. पण तरीही भाजपनं स्वबळाची चाचणी सुरु केली आहे. भाजपनं विधानसभा निवडणुकीत एकला चलो रेची भूमिका घेतल्यास अजित पवार, एकनाथ शिंदेचं टेन्शन वाढलं. राज्यात महाविकास आघाडीचं बळ वाढलेलं आहे. त्यापुढे शिंदे, अजित पवारांचा निभाव लागणं अवघड आहे. अशा स्थितीत या दोन पक्षांमधील अनेक आमदार पक्ष सोडतील. यातील काही भाजपसोबत जाऊ शकतील. तर पक्षफुटीनंतर शरद पवार, उद्धव ठाकरेंवर टीका न करता तटस्थ भूमिका घेतलेले आमदार घरवापसी करु शकतात.