भाजपला १७ वर्षांनंतर प्रमोद महाजनांची आठवण; ‘कौशल्य केंद्रा’तून नेमकं काय काय साधणार?

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या नावानं राज्यात ५११ कौशल्य केंद्रं उभारली जाणार आहेत. प्रमोद महाजन यांचं निधन १७ वर्षांपूर्वी झालं. १९ ऑक्टोबर २००६ मध्ये मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ६ ऑक्टोबर २००६ रोजी प्रमोद महाजन यांच्यावर त्यांच्या सख्ख्या भावानं गोळी झाडली होती. निधनानंतर १७ वर्षांनी महाजन यांच्या नावानं कौशल केंद्रं उभारली जात आहेत. राज्य भाजपला महाजनांची अचानक आठवण होण्यामागचं कारण काय अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

प्रमोद महाजन भाजपचे बडे नेते होते. पक्षात त्यांच्या शब्दाला वजन होतं. उत्तम रणनीतीकार असलेल्या महाजन यांनी पक्षाला राज्यासह केंद्रात सत्तेत आणलं. महाजन यांनी युतीचा मार्ग धरला आणि देशात अटलबिहारी वाजपेयी यांचं सरकार आलं. भाजप पहिल्यांदाच केंद्रात सत्तेवर आला. २००४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. त्याची जबाबदारी महाजन यांनी स्वीकारली. आता राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. शिंदेसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी सत्तेत सहभागी आहे.
Lok Sabha Election 2024: शिंदे, दादांची घसरगुंडी, मविआची मुसंडी; कोणाला किती जागा? बड्या गुंतवणूकदारानं अंदाज सांगितला
राज्यात काँग्रेसचं वर्चस्व असताना महाजन यांनी सत्ताधाऱ्यांना शह देण्यास सुरुवात केली. गोपीनाथ मुंडे यांच्या सोबतीनं त्यांनी राज्यात ‘माधव’ पॅटर्न राबवला. माळी, धनगर, वंजारी मतांची सांगड घातली. शिवसेनेसोबत हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर युती केली. याच युतीनं १९९५ मध्ये राज्यात सत्ताबदल घडला. महाजन यांची खेळी यशस्वी ठरली. राज्यात पहिल्यांदाच भाजप सत्तेत आला. त्याचं श्रेय महाजन, मुंडे यांना दिलं जातं.

गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात मनोज जरांगेंच्या नेतृत्त्वात मराठा समाजाचं आंदोलन सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जरांगेंशी संवाद राखत मराठा समाजाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे जरांगे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सातत्यानं लक्ष करत राहिले. त्यामुळे मराठा मतं भाजपपासून दुरावण्याची शक्यता निर्माण झाली.
Pune Car Accident: लाडोबाला वाचवण्यासाठी अगरवालचा खोटा दावा? तपासातून सत्य उघड, हाय-एंड पोर्शेमुळे गोत्यात
प्रमोद महाजन ब्राह्मण समाजातील होते. त्यांच्या बहिणीचा विवाह गोपीनाथ मुंडेंशी झाला होता. मुंडे ओबीसी समाजातील वंजारी जातीचं प्रतिनिधीत्व करायचे. ब्राह्मण आणि ओबीसी नेत्याच्या या जोडीनं राज्याच्या राजकारणात दोन दशकं स्वत:ची छाप पाडली. या काळात ब्राह्मण आणि ओबीसी मतदार भाजपशी जोडला गेला.


आता राज्य सरकार महाजन यांच्या नावानं कौशल्य केंद्रं सुरु करणार आहे. या माध्यमातून दोन जातींची मतं आपल्याकडे खेचण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. भाजपमध्ये आज पूनम महाजन आणि पंकजा मुंडे त्यांच्या कुटुंबाचं प्रतिनिधीत्व करत आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर संधी मिळत नसल्यानं मुंडे नाराज होत्या. आता भाजपनं त्यांना लोकसभा निवडणुकीत संधी दिली आहे. तर महाजन यांचं तिकीट कापलं आहे. आता भाजपनं त्यांच्या नावानं कौशल्य विकास केंद्रं सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा किती लाभ त्यांना विधानसभा निवडणुकीत होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.