भाजपच्या भीतीने अजित पवार गटाकडून नवाब मलिक यांना आमंत्रण नाही!

म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत न मिळाल्याने गेली दहा वर्षे दबावाखाली असलेल्या अनेक राजकीय पक्षांनी मोकळा श्वास घेतला असला तरी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मात्र अजूनही भाजपच्या दबावाखालीच असल्याचे आज स्पष्ट झाले. नवाब मलिक हे अजित पवार यांच्यासोबत असतानाही त्यांना आज आमदारांच्या बैठकीसाठी निमंत्रण देण्यात आले नाही.राष्ट्रवादीतील काही ज्येष्ठ नेत्यांशी याबाबत बोलले असता त्यांनी हे नजरचुकीने झाल्याचे सांगत सारवासारव केली. मात्र प्रत्यक्षात अनेक नेत्यांच्या मते नवाब मलिक यांच्यावर भाजपने घेतलेल्या आक्षेपामुळे मलिक यांना बोलावल्यास पुन्हा भाजपच्या नेतृत्वाचा रोष ओढवून घ्यावा लागेल किंवा कसे याची चिंता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाला आहे.
लोकसभेच्या निकालानंतर वारं फिरलं? दादांच्या बैठकीला ५ आमदारांची दांडी, अनेक जण पवार गटात जाण्याच्या चर्चा

नवाब मलिक सत्ताधारी बाकड्यांवर बसले, भाजपचा तीव्र आक्षेप

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर नवाब मलिक हे अजित पवार गटासोबत असल्याचे स्वतः अजित पवारांसह अनेकजणांनी स्पष्ट केले होते. मलिक हे आजारी असल्यामुळे जामिन मिळाल्यानंतरही राजकारणात सक्रीय झाले नव्हते. मात्र नागपूर अधिवेशनाला ते गेले असताना भाजप व शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटासोबत बसले असता तीव्र आक्षेप नोंदवला होता.
अजितदादांचे आमदार संपर्कात आहेत काय? जयंत पाटील म्हणाले, माझ्या मोबाईलचा वापर सध्या वाढलाय!

नबावभाईंच्या मतदारसंघात शेवाळे पिछाडीवर

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही मलिक सक्रीय नव्हते. त्यामुळेच शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राहुल शेवाळे हे मलिक यांच्या अणुशक्ती नगर या विधान सभा मतदारसंघात जवळपास ३० हजार मतांनी पिछाडीवर गेल्याचे समोर आले आहे.

मलिकांना सक्रीय ठेवायचे की नको, दादांवर भाजप-शिंदेसेनेचा दबाव

मलिक यांच्यासोबत आमची सहानुभूती असल्याचे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी वारंवार म्हटले आहे. ते जामिनावर सुटल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी अजित पवार गटासोबतच शरद पवार गटाचेही सर्व नेते गेले होते. मात्र प्रत्यक्षात भाजप व शिंदे यांच्या शिवसेनेच्या दबावामुळे मलिक यांनी सार्वजनिक जीवनात सक्रीय व्हावे किंवा कसे याबाबत अजित पवार पक्षाचे नेतृत्व अद्यापही संभ्रमात असून पक्षाचा लोकसभेत झालेल्या मोठ्या पराभवानंतरही मलिक यांना बोलावून भाजपची नाराजी ओढवून न घेण्याचाच राष्ट्रवादी काँग्रेसचा कल दिसत असल्याचे आज स्पष्ट झाले.