भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारतो, फडणवीस यांच्याकडून राजीनाम्याची तयारी

मुंबई : महाराष्ट्रात आम्हाला अपेक्षेपेक्षा फार कमी जागा मिळाल्या. परंतु आम्हाला जनतेने नाकारले नाही. महाविकास आघाडीपेक्षा आम्हाला निश्चित कमी जागा मिळाल्या. पण मतांच्या तुलनेत आम्ही केवळ अर्धा टक्का पाठीमागे आहोत, अशी प्रतिक्रिया देत महाराष्ट्र भाजपच्या पराभवाचे लंगडे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्याचवेळी सरकारमधून मला मोकळे करावं, जेणेकरून संघटनेसाठी काम करण्याला वेळ मिळेल. लोकसभेला ज्या कमतरता राहिल्या त्या आगामी निवडणुकीत भरून काढीन, असे शीर्षस्थ नेतृत्वाला विनंती करणार आहे, असे फडणवीस यांनी सांगून उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनाम्याची तयारी दाखवली.

सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसला. २०१९ च्या तुलनेत भाजपला १४ जागांचा फटका बसला. अगदी २३ खासदारांवरून भाजपची गाडी ९ खासदारांवर घसरली. महाराष्ट्रात भाजपच्या दारूण पराभवानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

इंडिया आघाडीला मिळून जेवढ्या जागा मिळाल्या, त्याच्यापेक्षा अधिक जागा एकट्या भाजपला मिळाल्या

जनतेने मोदींना तिसऱ्यांदा आशीर्वाद दिला. देशात पुन्हा एनडीएचे सरकार आले आहे. पंडित नेहरूंनंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा मान मोदींना मिळाला आहे. सगळ्या इंडिया आघाडीला मिळून जेवढ्या जागा मिळाल्या, त्याच्यापेक्षा अधिक जागा एकट्या भाजपला मिळाल्या आहेत. महाराष्ट्रात आम्हाला अपेक्षेपेक्षा फार कमी जागा मिळाल्या. महाराष्ट्रात नरेटिव्हची लढाई आम्हाला लढावी लागली. संविधान बदलाच्या प्रचाराच्या आम्हाला फटका बसला. जनतेने जो निकाल दिलाय तो शिरसावंद्यन मानून पुढच्या तयारीला लागू, असे सांगून ज्यांना जास्त जागा मिळाल्या, त्यांचे अभिनंदन करतो, असे फडणवीस म्हणाले.

फडणवीस टक्केवारीवर बोलले

इलेक्शनचे अर्थमेटिकमध्ये आम्ही पराभूत झालो, असे माझे मत आहे. मविआला ३० जागा मिळाल्या. त्यांना ४३.९१ टक्के मते मिळाली. तर महायुतीला ४३.६० टक्के मतदान मिळाले. अगदी मुंबईत मविआला २४ लाख मते आहेत तर महायुतीला २६ लाख मतं आहेत, त्यामुळे आम्हाला जनतेने नाकारले असे म्हणणे चुकीचे आहे, असे फडणवीस म्हणाले.

पराभवाची कारणे सांगितली

महाराष्ट्रात महाविकास आघाडीला नरेटिव्हचा फायदा झाला. सोयाबीन आणि कापसाच्या भावाने शेतकऱ्यांमध्ये रोष होता. त्यासाठी वेगळी योजना आखली होती, पण आचारसंहितमुळे तो विषय आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवू शकलो नाही. दुसरीकडे मराठा आरक्षण देऊनही एक नरेटिव्ह सेट करण्यात आला, विशेषत: मराठवाड्यात त्याचा फटका आम्हाला बसला. त्याचमुळे भाजपला अपेक्षित यश मिळू शकले नाही. याच पार्श्वभूमीवर सरकारमधून मला मोकळे करावं, जेणेकरून संघटनेसाठी काम करण्याला वेळ मिळेल. लोकसभेला ज्या कमतरता राहिल्या त्या आगामी निवडणुकीत भरून काढीन, असे शीर्षस्थ नेतृत्वाला विनंती करणार आहे, असे फडणवीस म्हणाले.