भाईंच्या शिलेदाराने शड्डू ठोकला, ३ जागांवर दावा सांगितला, भाजपसहित दादांचं टेन्शन वाढलं

आदित्य भवार, पुणे : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात आता विधानसभेचे वेध लागले आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीलमधील मित्रपक्षांनी राज्यातल्या विधानसभेच्या जागांवर दावा करायला सुरुवात केली आहे. अशातच पुणे शहरातल्या विधानसभेच्या ८ जागांपैकी शिवसेना शिंदे गटाने ३ जागांवर आपला दावा केला आहे. त्यादृष्टीने शिवसेनेची तयारीही सुरू आहे, अशी माहिती स्वत: शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी दिली आहे. तसेच हडपसर विधानसभा मतदारसंघातून मी स्वतः निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचेही त्यांनी सांगितले.

हडपसर, वडगावशेरी, खडवासला मतदारसंघावर आमची लढण्याची तयारी आहे, असे भानगिरे यांनी सांगितले. या भागांत शिवसेनेचे बऱ्याच अंशी प्राबल्य आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आमचे तिकडे चांगले काम आहे. त्यामुळे आम्हाला लढायला संधी मिळाली तर नक्की लढू, असे ते म्हणाले. त्याचवेळी वरील जागा अजित पवार यांच्या पक्षाकडे नाहीत, असे विचारल्यावर भानगिरे म्हणाले, “कुणी कोणत्याही जागांवर दावा करू शकतो, अंतिम निर्णय वरिष्ठ घेतील, असे आमचे बैठकीत ठरले आहे”
Pune News: हडपसर विधानसभेत दोन शहर अध्यक्ष विधानसभेच्या रिंगणात? यंदा पुण्यात मोठी चुरस

नाना भानगिरे स्वतः हडपसर विधानसभा लढवण्यास इच्छुक

हडपसर विधानसभा मतदारसंघात आम्ही तळा गळात जाऊन काम केलं आहे. दोन वर्षे महाविकास आघाडीला शहरात विकास करता आला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहा ते सात महिन्यात विकासाची गंगा पुण्यात आणली. त्यासोबत महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, कामगारांसाठी त्यांनी हिरिरीने निर्णय घेतले. आम्ही हडपसर मतदारसंघात गेली दोन वर्षे काम करत आहोत आणि म्हणून आम्ही या विधानसभेची मागणी केली आहे. परंतु वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असे भानगिरे यांनी आवर्जून सांगितले.
लोकसभेत ‘मविआ’साठी जागा सोडल्या, विधानसभेत शिवसेना जागा सोडणार नाही : भास्कर जाधव

तिथे दादांचे आमदार, तुम्हाला तिकीट मिळेल?

तिकीट मिळेल, अशी शक्यता किपपट वाटतीये? असा प्रश्न भानगिरे यांना विचारल्यावर ते म्हणाले, शेवटी राजकारण काम करणाऱ्या प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याची निवडणूक लढविण्याची इच्छा असते. वरिष्ठांना तिकीटासंदर्भात मेसेज दिला आहे. शेवटी प्रयत्न करत राहणे हे आपले काम आहे. उमेदवारी द्यायची की नाही द्यायची, हे वरिष्ठ ठरवतील, असे भानगिरे यांनी स्पष्ट केले.

राज्यातील जागा वाटपाची समीकरण अजून ठरलेली नाहीयेत. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाची आकडेमोड सुरू आहे. तोपर्यंतच विविध पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी तिथली तिथली परिस्थिती पाहून मतदारसंघावर दावा करण्यास सुरूवात केली आहे. मविआतील घटकपक्षांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून कोणत्या जागा लढवायला हव्यात, याचा सविस्तर अहवाल मागवला आहे.