बारामतीला २ खासदार, दादांकडून कुटुंबाला झुकतं माप; सुनेत्रा पवार मागच्या दारानं संसदेत जाणार

मुंबई: लोकसभा निवडणुकीत बारामतीच्या हायव्होल्टेज लढतीत पराभूत झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार राज्यसभेवर जाणार आहेत. त्यांच्या नावाची निवड राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. नणंद सुप्रिया सुळेंकडून पराभूत झालेल्या सुनेत्रा पवार मागच्या दारानं संसदेत जातील. त्यासाठी त्या आज सकाळी साडे अकरा वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

राज्यसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. प्रफुल पटेलांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांची वर्णी लावण्यात येणार आहे. सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवण्यात यावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी नेतृत्त्वाकडे केली होती. त्यानंतर सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. सुनेत्रा पवार बारामतीत सुप्रिया सुळेंविरोधात दीड लाख मतांनी पराभूत झाल्या. त्यानंतर पक्षानं त्यांची निवड राज्यसभेसाठी केली आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे.
एका बाबूंचा शपथविधी, दुसरे बाबू गैरहजर; नितीश गेले कुणीकडे? किंगमेकरच्या अनुपस्थितीची चर्चा
विशेष म्हणजे अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारदेखील राज्यसभेसाठी उत्सुक होते. त्यासाठी त्यांनी फेब्रुवारीतच प्रयत्न केले. त्यावेळी प्रफुल पटेलांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. पार्थ पवारांना राज्यसभेवर काम करण्याची इच्छा होती. त्यावेळी सुनेत्रा पवार बारामतीमधून लढणार असल्याचं निश्चित झालं होतं. एकाच कुटुंबातील दोन सदस्यांना लोकसभेचं तिकीट, राज्यसभेवर संधी दिल्यास पक्षात आणि जनतेत चुकीचा संदेश जाण्याची शक्यता असल्यानं पार्थ यांना त्यांच्या मागणीचा विचार नंतर करण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं.

पार्थ पवार २०१९ मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढले होते. पण एकसंध शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंनी त्यांना तब्बल २ लाखांहून अधिक मतांनी धूळ चारली. मागील निवडणुकीत अजित पवारांचे पुत्र पराभूत झाले. तर यंदा त्यांच्या पत्नींना निवडणुकीत पराभव पाहावा लागला. विशेष म्हणजे अजित पवारांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बारामतीमध्येच सुनेत्रा पवारांचा मोठा पराभव झाला. काकांची साथ सोडून सत्तेत गेलेल्या, पक्ष, चिन्ह मिळवून निवडणूक लढवणाऱ्या अजित पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.