फडणवीसांचे राजकारण सुडाचे नाही; ओन्ली राष्ट्र-नो महाराष्ट्र माझी भूमिका, तावडे दिल्लीतच

पुणे :‘ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुनेबद्दल बोलणे हा शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील प्रचार असू शकत नाही. पवारांप्रमाणेच खासदार संजय राऊत यांनी महायुतीच्या अमरावतीच्या उमेदवाराबद्दल केलेले वक्तव्य यापूर्वी कधीही महाराष्ट्राच्या प्रचारात ऐकायला मिळाले नाही. हा प्रकार दुर्दैवी आहे,’ अशी खंत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी व्यक्त केली. मी राज्याच्या राजकारणात येणार नाही. सध्या मी दिल्लीतच आहे. माझी भूमिका ही ‘ओन्ली राष्ट्र-नो महाराष्ट्र’ अशीच आहे, असेही तावडेंनी स्पष्ट केले. तर देवेंद्र फडणवीस यांनी कधीही सुडाचे राजकारण केले नाही, असंही ते म्हणाले.

लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडायचे की काँग्रेस नेते राहुल गांधी, हा निर्णय लोकांनी घ्यायचा असून, त्या अनुषंगाने प्रचारात मुद्दे मांडणे अपेक्षित आहे. दुर्दैवाने असे चित्र महाराष्ट्रात दिसत नसल्याचे निरीक्षण तावडे यांनी नोंदविले. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने शुक्रवारी आयोजित पत्रकार वार्तालाप कार्यक्रमात तावडे बोलत होते. पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, सरचिटणीस सुकृत मोकाशी या वेळी उपस्थित होते.
ठाकरे विरुद्ध शिंदे, भाजप विरुद्ध काँग्रेस, ४० मतदारसंघात दुरंगी लढती, कुठे काय चित्र?
‘पहिल्या दोन टप्प्यांतील निवडणुका झाल्या असून, तिसऱ्या टप्प्याचे मतदान होत आहे. भाजपकडून कोणत्या राज्यात, कोणत्या टप्प्यात कसा प्रचार करायचा, कुठले मुद्दे असले पाहिजेत, याचे नियोजन करण्यात आले असून, तसाच प्रचार सुरू आहे. महाराष्ट्रात मात्र विरोधकांकडून ज्या पद्धतीने प्रचार केला जात आहे, ते पाहता हा काही शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील प्रचार नाही,’ असे तावडे म्हणाले.
घोटाळ्यांचे आरोप, ईडी चौकशी, रवींद्र वायकर यांच्या संपत्तीत पाच वर्षांत किती वाढ?

‘फडणवीसांचे राजकारण सुडाचे नाही’

‘देवेंद्र फडणवीस यांनी कधीही सुडाचे राजकारण केले नाही. ज्यांनी जनतेशी गद्दारी केली, त्यांना धडा शिकवला पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती. गद्दारीचा समाचार घेणे याला सूड म्हणत नाहीत. लोकांशी गद्दारी केली, तर धडा शिकवला पाहिजे. विचारांनी मते मागितली, यश मिळवले, विचारांनी सरकार बनलेले असते. त्यांनी आकड्याचे राजकारण केल्यामुळे आम्हालाही आकड्यांचे राजकारण करावे लागले,’ असेही तावडे म्हणाले.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

‘अजित पवारांवर दबाव अशक्यच’

‘राजकीय नेते दबावापोटी भारतीय जनता पक्षात प्रवेश करत असल्याचे चित्र दिसते. सुनेत्रा पवार यांना दबावापोटी निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याचा आरोपही होत आहे,’ असे विचारले असता, ‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कोणाचा दबाव असू शकतो का? त्यांनी शरद पवार यांचे ऐकले नाही. मी त्यांचा चांगला मित्र आहे. त्यांच्यावर कोणीही दबाव आणू शकत नाही,’ असे तावडे यांनी स्पष्ट केले.

मी राज्याच्या राजकारणात येणार नाही. सध्या मी दिल्लीतच आहे. माझी भूमिका ही ‘ओन्ली राष्ट्र-नो महाराष्ट्र’ अशीच आहे.

– विनोद तावडे, राष्ट्रीय सरचिटणीस, भाजप