फडणवीसांचा फोन, मोदींकडून नो रिस्पॉन्स; ‘तो’ निर्णय राहिला, DMK फॅक्टरमुळे भाजपला धक्का

मुंबई: लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये स्वबळावर बहुमताचा आकडा गाठणाऱ्या भाजपला यंदा २३९ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे पुन्हा सरकार स्थापन करायचं असल्यास भाजपला मित्रपक्षांचा टेकू लागेल. त्यामुळे आता केंद्रात मोदी सरकार नसेल, तर एनडीए सरकार असेल.

राज्यात महायुतीला मोठा धक्का बसला आहे. गेल्या निवडणुकीत एनडीएला राज्यात ४१ जागा मिळाल्या होत्या. त्या यंदा १७ वर आल्या आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपच्या २३ जागा निवडून आल्या होत्या. पण यंदा संपूर्ण महायुतीला मिळूनही त्या जागांच्या जवळपास जाता आलेलं नाही. विदर्भात भाजपला मोठा फटका बसला आहे. विदर्भात मागील निवडणुकीत एनडीएनं १० पैकी ८ जागा जिंकल्या होत्या. यंदा नेमकी उलट परिस्थिती आहे. महाविकास आघाडीनं १० पैकी ७ जागा जिंकल्या आहेत.
Lok Sabha Election Result 2024: अब की बार महत्प्रयासानं नय्या पार; भाजपची आता N फॅक्टरवर मदार; ‘ते’ दोघे काय करणार?
२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत विदर्भात भाजपनं ६ जागा लढवत ५ जागा जिंकल्या होत्या. यंदा भाजपनं ७ जागा जिंकल्या. पण त्यांना केवळ २ जागा जिंकल्या आहेत. नागपूर, अकोल्यात भाजपनं विजय मिळवला. पण अमरावती, चंद्रपूर, वर्धा, भंडारा-गोंदिया, गडचिरोलीत भाजपला पराभव पत्करावा लागला. विशेष म्हणजे यातील ४ जागांवर काँग्रेसनं भाजपचा धुव्वा उडवला.

DMK फॅक्टर भाजपविरोधात
धनगर, माळी, कुणबी समाजाचं प्रमाण विदर्भात मोठं आहे. कुणबी समाजातील नेत्याला मंत्रिमंडळात घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जानेवारीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन केला होता. पण मोदींकडून ग्रीन सिग्नल न मिळाल्यानं मंत्रिमंडळ विस्तार रखडला. कुणबी मतं आपल्याकडे खेळण्याचा फडणवीसांचा प्रयत्न होता. पण दिल्लीतून ग्रीन सिग्नल मिळाला नाही. त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत भाजपला बसलेला दिसतोय. उपमुख्यमंत्री फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विदर्भात पक्षाचं पानीपत झालंय.