पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी? रवींद्र धंगेकरांचा संतप्त सवाल, अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी

पुणे: पोलीस स्टेशन बाहेर आंदोलन केले म्हणून पोलिसांनी आमच्यावर गुन्हा दाखल केला. पण त्याचवेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनीही आंदोलन केले पण त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही. भाजप सत्ताधारी पक्ष आहे म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही का? की लोकसभा निवडणुकीचा निकाल ‘इंडिया आघाडी’च्या बाजूने लागल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करणार आहात? असा सवाल पुणे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी उपस्थित केला.पोलिसांनी एकाची बाजू झाकून ठेवणे आणि दुसऱ्यावर गुन्हा दाखल करणे, हे कितपत योग्य आहे, असेही ते म्हणाले. पुणे लोकसभा मतदारसंघाची १३ मे रोजी निवडणूक झाली. या निवडणुकीच्या आदल्या रात्री भाजपकडून मोठ्या प्रमाणात पैसे वाटप करण्यात आले. म्हणून रवींद्र धंगेकर आणि कार्यकर्त्यानी आंदोलन केले. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या पार्श्वभूमीवर रवींद्र धंगेकर यांनी पोलीस आयुक्तांना पत्र दिले.
नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री तर विचारेंसाठी आदित्य ठाकरे, अखेरच्या दिवशी जोरदार शक्तिप्रदर्शनयावर रवींद्र धंगेकर म्हणाले, निवडणुकीच्या आदल्या रात्री भाजपकडून मोठ्या प्रमाणात पैसे वाटण्यात आले. रात्रीच्या अंधारात सुरू असलेले हे पाप काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उजेडात आणले. पैसे वाटणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांवर तातडीने गुन्हा दाखल करा, अशी मागणी आम्ही सहकार नगर पोलिसांकडे केली. मात्र, पोलिसांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले नाही. पैसे वाटणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला नाही म्हणून लोकशाही मार्गाने मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली.

आंदोलन, उपोषण हे लोकशाहीने राज्यघटनेने या देशातील जनतेला बहाल केलेले अस्त्र आहे. लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन केले. पण, दोन दिवसानंतर आमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र त्याचवेळी राजेंद्र शिळीमकर, विनोद वस्ते, सुभाष जगताप आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनीही सहकार नगर पोलीस चौकीबाहेर आंदोलन केले होते. याचे वृत्त विविध दैनिकात वाहिन्यांवर प्रसिद्ध झाले. तरीही त्यांच्यावर कसल्याही स्वरूपाचा गुन्हा अद्यापपर्यंत पोलिसांनी दाखल केला नाही. भाजप सत्ताधारी पक्ष आहे म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही का? की लोकसभा निवडणुकीचा निकाल ‘इंडिया आघाडी’च्या बाजूने लागल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करणार आहात? पोलिसांची नेमकी भूमिका काय आहे? हे जनतेला समजले पाहिजे, असे रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.

मतदानाच्या दिवशी पाटील इस्टेट भागात भाजपचे कार्यकर्ते पैसे वाटत होते. हा प्रकार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उघड केला. पण पोलिसांनी आरोपींना सोडून दिले. याच दिवशी हेमंत रासने आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी फडके हौद परिसरात ठिय्या आंदोलन केले. हे प्रकरणही पोलिसांनी झाकून ठेवले. त्यांच्यावरही कसल्याही स्वरूपाचा गुन्हा अद्यापपर्यंत दाखल झाला नाही. आमच्यावरच गुन्हा दाखल करण्याचे कारण काय? पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी? असा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही. पोलिसांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला तसाच भाजपच्या कार्यकर्त्यांवरही गुन्हा दाखल झाला पाहिजे. तो अद्याप का दाखल झाला नाही, याबद्दल संबंधित पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे. वेगवेगळी वागणूक दिल्याबद्दल ते दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाईसुद्धा झाली पाहिजे, अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली.