पोर्शे अपघाताच्या रात्री आमदाराला सव्वा तासात ४५ मिस्ड कॉल्स; दादांची राष्ट्रवादी गोत्यात

पुणे: ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणामुळे सरकारी यंत्रणा, प्रशासनातील अधिकारी, राजकारणी, धनाढ्य यांचे हितसंबंध उघडकीस येऊ लागले आहेत. पोर्शे कार अपघातात दोघांचा जीव गेला. ती कार बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालचा अल्पवयीन मुलगा चालवत होता. अपघात होताच स्थानिकांनी, पादचाऱ्यांनी आरोपीला पकडलं. त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. त्यानंतर स्थानिक आमदार सुनील टिंगरेंनी तातडीनं पोलीस ठाण्यात धाव घेतली. गुन्हेगाराला वाचवण्यासाठीच टिंगरे यांच्या धावून गेल्याचा संशय व्यक्त होऊ लागला. आता या प्रकरणात नवा उलगडा झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरेंचं नाव पोर्शे अपघात प्रकरणात पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. टिंगरेंना विशाल अगरवालच्या मोबाईल नंबरवरुन ४५ मिस्ड कॉल गेले होते. आरोपीच्या वडिलांनी टिंगरेंना इतके कॉल का केले, असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे हे सगळे कॉल १९ मे रोजी म्हणजेच अपघात झाला त्या रात्री करण्यात आले. न्यूज १८नं पोलीस दलातील सुत्रांच्या हवाल्यानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
Pune Car Accident: आरोपीच्या मित्राची ६ तास चौकशी; पोलिसांच्या हाती खळबळजनक माहिती, काय घडलं ‘त्या’ रात्री?
टिंगरे यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रचंड अडचणीत आला आहे. टिंगरे यांचे एकट्या अगरवाल यांच्याशी संबंध नाहीत, तर या प्रकरणात अटक झालेल्या ससून रुग्णालयाच्या डॉ. अजय तावरेशीदेखील टिंगरेंचे संबंध आहेत. तावरे ससूनच्या फॉरेन्सिक लॅब विभागाचे प्रमुख होते. त्यांच्या नियुक्तीसाठीचं शिफारसपत्र टिंगरेंनीच दिलं होतं. धक्कादायक बाब म्हणजे तावरेवर २०२२ मध्ये किडनी तस्करीचा आरोप झाला. यानंतर त्याची अधीक्षक पदावरुन उचलबांगडी झाली. पण टिंगरेंच्या शिफारसपत्रामुळे तावरे डिसेंबर २०२३ मध्ये पुन्हा अधीक्षकपदी रुजू झाला. याच तावरेनं पोर्शे प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी रक्ताचे नमुने बदलले आणि पुरावे नष्ट केले.
Pune Car Accident: पोर्शे प्रकरणामुळे अजितदादा गट अडचणीत; ‘ती’ जागा हातून गेल्यात जमा, भाजपच्या हाती आयतं कोलीत
या प्रकरणात अडचणीत आलेल्या आमदार सुनील टिंगरेंनी स्पष्टीकरण दिलं. अपघातानंतर आपण येरवडा पोलीस ठाण्यात गेलो. पण पोलिसांवर कोणताही दबाव आणला नाही, अशी सारवासारव त्यांनी केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ मेच्या मध्यरात्री २.३० ते ३.४५ च्या दरम्यान म्हणजेच सव्वा तासात टिंगरेंना ४५ मिस्ड कॉल आले. त्यावेळी टिंगरे झोपलेले होते. त्यांनी एकही कॉल घेतला नाही. त्यानंतर अगरवाल घाईघाईत टिंगरेंच्या घरी पोहोचले, अशी माहिती सुत्रांनी दिली.

२० मे रोजी टिंगरेंनी एक स्पष्टीकरण जारी केलं. त्यामधून टिंगरे सकाळी ६ वाजेपर्यंत पोलीस ठाण्यातच होते, ही बाब स्पष्ट झाली. कायद्यानुसार कारवाई करा, असं मी पोलिसांना सांगितलं. त्यांच्यावर कोणताच दबाव आणला नाही, असं त्यांनी स्पष्टीकरणात म्हटलं. पण अगरवाल यांच्याशी टिंगरेंचे असलेले संबंध, गुन्हा घडला त्याच रात्री टिंगरेंना आलेले ४५ मिस्ड कॉल्स, टिंगरेंनी तावरेच्या नियुक्तीसाठी दिलेलं शिफारसपत्र यामुळे स्थानिक आमदारांबद्दलचा संशय वाढला आहे.