पुण्यापेक्षा भयंकर, निर्घृण अपघात, घटनाक्रम सांगताना पोलिसांना शहारे; मुलाला दिला…

प्रतिनिधी, मुंबई : वरळी येथील हिट अँड रनचे सीसीटीव्ही फुटेज हाती लागले असून ते पाहून हा अपघात पुण्यातील अपघातापेक्षा भयंकर आणि निर्घृण असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.गाडीचे चाक आणि बंपर यात कावेरी नाखवा या अडकल्याची जाणीव होऊनही मुख्य आरोपी मिहीर शहा याने सुमारे दीड किलोमीटर त्यांना फरफटत नेले. त्याचे निर्दयी मन इतक्यावरच थांबले नाही तर कावेरी यांना सोबत असलेला चालक राजऋषी बिडावत याच्या सहाय्याने बाहेर काढले. त्यानंतर त्यांना रस्त्यावर ठेवून राजऋषी याने पुन्हा कार त्यांच्या अंगावर चढवली आणि पसार झाले. अंगावर काटा आणणारे कृत्य करणारा मिहीर अद्याप फरार असून त्याच्या विरुद्ध लूकआउट नोटीस बजावण्यात आली आहे.
Worli Hit And Run Case : मी मुख्यमंत्री असेपर्यंत कोणालाही…, वरळी हिट अँड रन प्रकरणी एकनाथ शिंदे थेट बोलले

रविवारी पहाटे वरळी कोळीवाड्याच्या दिशेने दुचाकीवरून जात असताना प्रदीप नाखवा आणि त्यांच्या पत्नी कावेरी नाखवा यांना भरधाव बीएमडब्ल्यू कारने धडक दिली. या अपघातामध्ये कावेरी यांचा मृत्यू झाला तर प्रदीप जखमी झाले. दुचाकीला धडक दिल्यानंतर मिहीर शहा याने कार थांबविण्याऐवजी आणखी वेगात पळवली. प्रदीप बोनेटवरून खाली पडले मात्र चाकात साडी गुरफटल्याने कावेरी या चाक आणि बंपरमध्ये अडकल्या. काही अंतरावर गेल्यानंतर त्यांना जखमी अवस्थेत रस्त्यावर ठेवले. यानंतर गाडीचा ताबा राजऋषी याने घेत त्या जिवंत राहू नयेत, अशा इराद्याने पुन्हा गाडी त्यांच्या अंगावर चढवली आणि वांद्र्याच्या दिशेने निघून गेले.

मुलास पसार होण्याचा सल्ला

या अपघातानंतर मिहीर याने वडील आणि शिवसेना उपनेता राजेश शहा याला फोन करून माहिती दिली. वडिलांनी अपघाताची जबाबदारी चालक राजऋषी याच्यावर ढकलून पसार होण्यास मिहीरला सांगितले. मिहीर वांद्रे कलानगर येथून पळाला तर चालक राजऋषी राजेश याची वाट पाहत थांबला. टोइंग व्हॅन पोहोचण्याआधी सीसीटीव्ही फुटेजवरून माग काढत पोलिस कलानगरला पोहोचले आणि कारसह राजेश आणि राजऋषी या दोघांना ताब्यात घेतले.

वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहा याचे वडील व शिवसेनेचे उपनेते राजेश शहा यांना सोमवारी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर लगेचच त्यांच्या वतीने जामीन अर्ज करण्यात आल्याने कायद्यातील तरतुदी व त्यांच्यावरील आरोप लक्षात घेत, मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी (शिवडी) एस. पी. भोसले यांनी त्यांना जामीन मंजूर केला.

‘घटनेनंतर राजेश यांनीच मिहीरला पसार होण्याचा सल्ला दिला. आता मिहीर पसार असल्याने त्याचा शोध सुरू आहे. राजेश यांनाच मिहीरचा थांगपत्ता माहीत आहे. त्यामुळे त्यांच्या पोलिस कोठडीची आवश्यकता आहे,’ असा युक्तिवाद पोलिसांतर्फे करण्यात आला. तर ‘मुलगा बेपत्ता आहे म्हणून वडिलांना अटकेत ठेवणे कायदेशीरदृष्ट्या योग्य होते का? अडचणीत असताना कोणत्याही मुलाने वडिलांना संपर्क साधणे स्वाभाविक आहे. त्यानुसार मिहीरने वडिलांना कॉल केला होता; परंतु, राजेश हे ती कार चालवत नव्हते आणि त्या घटनेसाठीही ते कारणीभूत नाहीत. त्यामुळे नव्या भारतीय न्याय संहितेतील तरतुदींप्रमाणे राजेश शाह यांना सदोष मनुष्यवध हे कलम लागू होत नाही. त्याचप्रमाणे बिडावत याच्या कोठडीचीदेखील आवश्यकता नाही, कारण त्याच्याकडून काहीच हस्तगत करण्यात आलेले नाही,’ असा युक्तिवाद आरोपींतर्फे अॅड. सुधीर भारद्वाज यांनी केला. अखेरीस न्यायाधीशांनी राजेश यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली, तर राजऋषी याला एक दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्या आदेशानंतर राजेश यांच्यातर्फे लगेचच जामीन अर्ज दाखल करण्यात आला. त्याविषयीच्या सुनावणीअंती राजेश यांना सदोष मनुष्यवधाचे कलम लागू होत नाही, असे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने त्यांना सशर्त जामीन मंजूर केला.