पुण्यातील मुजोर रिक्षाचालकांचे करायचे काय? तक्रारीसाठी प्रवाशांकडून ‘व्हॉट्सअ‍ॅप’ क्रमांकाची मागणी

प्रतिनिधी, पुणे : रिक्षाचालकांच्या विरोधातील तक्रारींचे प्रमाण वाढत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मीटरपेक्षा जास्त भाडे आकारणे, जवळचे भाडे नाकारणे, प्रवाशांसोबत अरेरावी करणे आदी तक्रारींचा समावेश आहे. रिक्षाचालकांच्या विरोधात तक्रार करण्याची पद्धत सोपी नसल्यामुळे ‘प्रादेशिक परिवहन विभागा’कडे (आरटीओ) एखादीच तक्रार येते. या पार्श्वभूमीवर मुजोर रिक्षाचालकांच्या विरोधात तक्रारीसाठी ‘व्हॉट्सअ‍ॅप’ क्रमांक सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे.

गेल्या आठवड्यात आईला हॉस्पिटलमध्ये भेटण्यासाठी जाणाऱ्या महिलेला रिक्षाचालकाने उद्धट वर्तन करून भररस्त्यात उतरवले; तसेच, तिच्याकडून जादा भाडेही आकारले, अशा आशयाची तक्रार ‘आरटीओ’ कार्यालयात नोंदविण्यात आली. संबंधित महिलेने रिक्षाचालकाची रितसर तक्रार केली असून, ‘आरटीओ’ने चौकशीही हाती घेतली आहे. रिक्षाचालकांकडून वाईट अनुभव येणारा प्रत्येक ग्राहक ‘आरटीओ’मध्ये जाऊन तक्रार नोंदवेलच अशी शक्यता नाही. त्यामुळे रिक्षाचालकांविरोधात खूपच कमी तक्रारी येतात. तक्रारी येत नसल्यामुळे कारवाई करता येत नसल्याचे ‘आरटीओ’चे अधिकारी सांगतात.

मुजोर रिक्षाचालकांच्या विरोधात दरमहा एखादीच तक्रार नोंदवली जाते. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही केली जात नाही. त्यातच तक्रार करण्याची पद्धत अतिशय किचकट आहे. ही पद्धत सुलभ केल्यास नागरिक तक्रारी नोंदविण्यास पुढे येतील. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सहजरीत्या तक्रारी करता याव्यात, यासाठी ‘आरटीओ’ने ‘व्हॉट्सअ‍ॅप’ क्रमांक सुरू करावा, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

सध्या तक्रार कशी करता येईल?

– एखाद्या रिक्षाचालकाने जास्त भाडे आकारले, उद्धट वर्तन केले किंवा भाडे नाकारले तर संबंधिताची तक्रार ‘आरटीओ’च्या ‘rto.12-mh@gov.in’ या ई-मेल आयडीवर करता येते.
– याशिवाय नागरिक स्वतः ‘आरटीओ’मध्ये जाऊन आवक-जावक विभागात कागदावर लिहून तक्रार करू शकतात.
– त्यानंतर संबंधित रिक्षाचालकाला नोटीस देऊन कारवाई करण्यात येते.
– त्यामध्ये दंडात्मक कारवाईबरोबरच रिक्षा परमिट काही दिवस रद्द करण्याची कारवाई होते.

मी ज्येष्ठ नागरिक असून, रिक्षाचालक नेहमीच जवळचे भाडे नाकारतात, असा अनुभव आहे. ज्येष्ठ नागरिक बसचा प्रवास करू शकत नाहीत; तसेच कार, बाइक चालवू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना रिक्षाशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. रिक्षाचालक नेमका याचा गैरफायदा घेऊन अडवणूक करतात. ‘आरटीओ’चे दुर्लक्ष याला कारणीभूत आहे. रिक्षाचालकांची तक्रार ज्येष्ठ नागरिक तक्रार कशी करणार? त्यामुळे तक्रार करण्यासाठी ‘व्हॉट्सअ‍ॅप’ क्रमांक ‘आरटीओ’ने सुरू करावा.- सुरेश पठारे, खराडी

गावाहून मगरपट्टा येथे उतरल्यानंतर रिक्षाचालक कधीही मीटरने सेवा देत नाहीत. नेहमीच जास्त पैसे मागतात. त्यांच्यावर कोणाचाही कोणताही वचक नसल्यामुळे ते अरेरावी करतात. यांच्या विरोधात कुठे तक्रार करायची हेच नागरिकांना माहीत नाही. तक्रार करण्यासाठी एक क्रमांक सुरू करण्याची गरज आहे. तक्रार आल्यानंतर ‘आरटीओ’ने तत्काळ कारवाई करावी म्हणजे रिक्षाचालकांचीPमुजोरी संपेल.- सोमनाथ म्हस्के, पुणे