पुढील २ दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबईसाठी ‘रेड अलर्ट’ जारी, नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन

मुंबई: काल रात्रीपासून महाराष्ट्रातील मुंबईत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील अनेक भागात पाणी साचल्याची परिस्थिती आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. येत्या २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचवेळी काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
‘डोळ्यादेखत वावर पाण्यात गेलं, काय पेरा इथं…’ पावसात पीक गेल्यानं शेतकऱ्याच्या लेकाचा मन हेलावणारा आक्रोश
याबाबत आयएमडी मुंबईचे संचालक सुनील कांबळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “जर तुम्ही मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) आणि मुंबई क्षेत्राबद्दल बोललो, तर आम्ही सकाळी ८.३० वाजेपर्यंत २७० मिमी पावसाची नोंद केली आहे. आम्ही ऑरेंज अलर्ट जारी केला असून तो उद्या सकाळपर्यंत कायम राहणार आहे. त्यानंतर पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. मुंबईला संध्याकाळी दिलेल्या इशाऱ्यात रेड अॅलर्ट देण्यात आला आहे.भारतीय हवामान खात्याने मुंबईसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. मुंबईकर नागरिकांनी आवश्यकता नसल्यास शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. काही आवश्यकता भासल्यास मदतीसाठी आणि अधिकृत माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या १९१६ या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, अशी विनंती करण्यात येत आहे.

दरम्यान मुंबई शहरात गेल्या २४ तासांत मध्यम ते मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची नोंद झाली आहे. कुलाबा येथे ९७.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सांताक्रूझ येथे ११.५ मिमी, राम मंदिर २१ मिमी, भायखळा ६५ मिमी, चेंबूर ३८.५ मिमी, सायन १३.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे. रस्ते, रेल्वे रुळ, सखल भागात पाणी साचणे, घरे, दुकाने किंवा कार्यालयात पाणी साचणे, मेट्रो बंद आणि अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे लोकांना समस्यांना सामोरे जावे लागले. मुसळधार पावसामुळे उपनगरीय लोकल गाड्यांना उशीर झाला, तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या.