पुढील तीन-चार तास महत्त्वाचे, मुंबईत पावसाचा जोर वाढणार, वाचा Weather Report

मुंबई: राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाकडून काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर, रत्नागिरी, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि साताऱ्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, अमरावती, नागपूर आणि वर्ध्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यादरम्यान विजांचच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. अहमदनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांनाही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईत पावसाचा जोर वाढणार

पुढील काही तासात मुंबईत पावासाचा जोर आणखी वाढणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मध्यरात्रीपासून मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस कोसळतो आहे. त्यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. तर, पुढील तीन ते चार तासात मुंबईत आणखी जोरदार पाऊस कोसळेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसाचा जोर वाढणार असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचं आणि सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस कोसळत असल्याने अंधेरी सबवेमध्ये दोन ते तीन फूट पाणी साचल्याने सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तर जोरदार पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याचं चित्र आहे

मुंबईत पुढील चार दिवस पावसाचे

पुढील चार दिवस म्हणजेच २२ जुलैपर्यंत मुंबईत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा देम्यात आला आहे. गेल्या २४ तासात कुलाबा येथे १०१ मिमी इतका पाऊस झाला, तर सांताक्रूझ येथे ५०.२ मिमी पाऊस कोसळला आहे.

पुण्यालाही पावसाचा इशारा

पुण्यात आज हलक्या सरी बरसतील. तर, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्याशिवाय, कोकण, घाटमाथ्यावर तसेच विदर्भात मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. कोकण किनारपट्टी भागात गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस होतो आहे. राज्यात बहुतांश भागात चांगला पाऊस झाला. हवामान विभागाने सहा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.