निवडणुकीला उभे राहताय असे ऐकले, जेव्हा शरद पवार नाना पाटेकरांना फोन करतात..!

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या काळात विविध राजकीय पक्षांच्या मला ऑफर होत्या. परंतु राजकारण हा माझा प्रांत नसल्याने त्या क्षेत्रात मी गेलो नाही. माझ्या निवडणूक लढविण्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यावर मला ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा फोन आला होता, असा किस्सा प्रतिभावान अभिनेते नाना पाटेकर यांनी सांगितला.

‘प्रहार’, ‘तिरंगा’, ‘क्रांतीवीर’, ‘वजूद’, ‘अब तक छप्पन’, ‘वेलकम’ तसेच मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यावर आधारित असणारा ‘२६/११’ अशा एकापेक्षा एक सरस चित्रपटांतून रसिक प्रेक्षकांचे गेली ४० वर्षे मनोरंजन करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी ‘लल्लनटॉप’ला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत बालपणीचे उनाड दिवस, तरुण वयात केलेला संघर्ष, चित्रपटसृष्टीतील आगमन, त्यादरम्यानचे किस्से, राजकारण्यांशी असलेले मैत्र, दुष्काळकाळातील ‘नाम फाऊंडेशन’चे काम, आदी विषयांवर नाना पाटेकर यांनी मनमोकळेपणाने संवाद साधला.
Nana Patekar: नाना पाटेकरांना पोटच्या लेकराची वाटायची लाज,अडीच वर्षांचा असतानाच झाला मृत्यू, किंमत कळली पण उशीर झाला….

जेव्हा शरद पवार यांनी नाना पाटेकरांना फोन केला..!

नाना पाटेकर म्हणाले, निवडणूक काळात विविध राजकीय पक्षांच्या मला ऑफर होत्या. परंतु मी स्पष्टवक्ता असल्यामुळे माझ्यासारख्या माणसाचे राजकारणात टिकायचे नाही, हे मला माहिती आहे. उद्या जर पक्षप्रमुखाविषयी मी उलट सुलट बोललो तर त्यांना चालेल का? त्यामुळे मी राजकारणात पडत नाही, तो माझा प्रांत नाही, असे नाना पाटेकर यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या बातम्या टीव्हीवरून सुरू होत्या. त्या बातम्या ऐकून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मला फोन केला. नाना आपण निवडणूक लढवणार आहात, अशा बातम्या पाहिल्या, असे पवारसाहेब मला म्हणाले. त्यावर या चर्चांत कोणतेही तथ्य नाही. मला जर राजकारणात यायचे असते तर आधी तुम्हालाच सांगितले असते, असे मी पवारसाहेबांना सांगितल्याचे नाना म्हणाले.
Nana Patekar: त्यावेळी मी गप्प बसलो कारण… तनुश्री दत्ताच्या गंभीर आरोपावर पहिल्यांदाच बोलले नाना पाटेकर

चित्रपसृष्टीतील कलाकारांना नागरी पुरस्कार कशाला?

चित्रपसृष्टीतील कलाकारांना नागरी पुरस्कार देण्यावरूनही नाना पाटेकर यांनी आपली रोखठोक भूमिका स्पष्ट केली. मला पद्मश्री पुरस्कार मिळाला, त्यावेळी मी काय मोठा तीर मारला, अशी भावना माझ्या मनात आली. चित्रपट सृष्टीतल्या योगदानाबद्दल मला पद्मश्री देत असल्याचे शासनाने मला सांगितले. पण मी तर प्रत्येक गोष्टीचे पैसे घेतले होते, फुकटात थोडी मी काम केले होते. खेळाडूंसाठी खेलरत्न पुरस्कार आहे, कलाकारांसाठी दादासाहेब फाळके पुरस्कार आहे, असे म्हणत कलाकारांना नागरी पुरस्कार देण्यावर एकप्रकारे पुर्नविचाराची गरज असल्याचे मत नाना पाटेकर यांनी व्यक्त केले.

सामाजिक कार्याचा कधीही गवगवा करायचा नसतो

सामाजिक कार्याचा कधीही गवगवा करायचा नसतो. जे चांगले आहे, ते काम करण्याचा प्रयत्न करतो. मग एखाद्याला मारून चांगले वाटत असेल तर ते ही करतो, असेही मिश्लिकपणे नाना म्हणाले.