निवडणुकीच्या रणात मतदारांचा घसा कोरडा, बारामती तालुक्यात नागरिकांची पाण्यासाठी वणवण

बारामती : कोणी भावनिक होऊन तर कोणी विकासाच्या मुद्द्यावर ‘बारामती’चा खासदार होण्याची स्वप्ने पाहत असताना, या मतदारसंघातील सुपा परगण्यातील छोट्या मोठ्या वाड्या वस्त्यांसह २० गावांमधील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सुपा, कुतवळवाडी, भोंडवेवाडी, वढाणे, चांदगुडेवाडी येथील तलाव कोरडे पडल्याचे चित्र आहे.

बारामतीमध्ये थोरले आणि धाकटे पवार निवडणुकीच्या प्रचारात, तर जिल्हा प्रशासन निवडणूक कामात अडकले असताना, नागरिकांची तहान कशी भागवायची याकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे. देशातील विकसित भाग म्हणून बारामती तालुक्याकडे राष्ट्रीय पातळीवर पाहिले जाते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पवार कुटुंबातच लढाई सुरू आहे. त्यामुळे देशाचे लक्ष या निवडणुकीकडे आहे. मात्र, याच ठिकाणी जिरायती भाग समजल्या जाणाऱ्या सुपा परगण्यातील १५ ते २० गावांसह वाड्यावस्त्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यामुळे पाण्याच्या थेंबासाठी आसुसलेले मतदार मतदान यंत्रावरील बटण दाबण्यासाठी तरी जाणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

बोअरचे पाणी विहिरीत

जनाई शिरसाई प्रकल्पावर अवलंबून असणाऱ्या सुपा परगण्यातील गावांसह वाड्या वस्त्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. दौंड, बारामती, इंदापूर या भागांत मोठ्या प्रमाणात होणारी पाण्याची पळवापळवी रोखली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. सुप्याच्या तलावातून सुपा, काळखैरेवाडी, चांदगुडेवाडी, पानसरेवाडी, भोंडवेवाजीसह अन्य गावांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, जनाई शिरसाई प्रकल्पातून वरवंड तलावात आणि तेथून पंपाद्वारे सुपा तलावात पाणी कधी येणार याची नागरिक वाट पाहत आहेत. सुपा तलावाच्या शेजारी शेतकऱ्यांनी बोअर घेतले आहेत. त्या शेजारीच काही विहिरी खोदल्या असून, बोअरचे पाणी विहिरीत साठविण्यात येते. नंतर टँकर भरून गावांना पाणीपुरवठा केला जातो.
मोदींची २९ एप्रिलला पुण्यात जाहीर सभा; नेहरु, गांधींनंतरचे रेसकोर्सवर सभा घेणारे तिसरे पंतप्रधान
दुष्काळ कोठे?

सुपे, चांदगुडेवाडी, काळखैरेवाडी, भोंडवेवाडी, कुतवळवाडी, पानसरेवाडी या सात ग्रामपंचायतींसह नारोळी, कुरोळी, काऱ्हाटी, बाबुर्डे, शेरे वाडी, आंबी खुर्द, मोरगाव, आंबी बुद्रुक, वढाणे अशी सुमारे १५ ते २० गावे पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

यंदा पाऊस झाला नाही. प्यायला, शेतीला आणि जनावरांना पाणी नाही. दोन महिन्यापासून टँकर सुरू आहे. आठवड्यातून एकदाच टँकर येतो.- मनोज भोंडवे, भोंडवेवाडी

आमच्या भागात पाण्याची भीषण टंचाई आहे. एक हंडाभर पाणी पुरून वापरावे लागते. जनाई शिरसाई प्रकल्पातून पाणी सोडण्यासाठी फक्त तारखा सांगितल्या जातात; पण पाणी अद्याप येत नाही.- अभिजित कुतवळ, कुतवळवाडी