निधीबाबत काय सांगता? तो आमच्या टॅक्सचा पैसा, कोणाच्याही मालकीचा नाही, कोल्हेंनी सुनावलं

प्रशांत श्रीमंदिलकर, शिरूर (पुणे) : एखाद्या राष्ट्रीय अध्यक्षाला जर चार जागांवर समाधान मानावे लागत असेल तर ही परिस्थिती काय आहे हे आपण समजावं. त्यातही एक स्वतःच्या प्रदेशाध्यक्षांना उमेदवारी द्यावी लागते तर एक पत्नींना उमेदवारी द्यावी लागते आणि दोन उमेदवार हे बाहेरून आयात करावे लागत आहे. यातच काय परिस्थिती आहे हे समजून जा, अशी फटकेबाजी करून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शाब्दिक बोचकारे काढले. शिरूर लोकसभा मतदारसंघात ते माध्यमांशी बोलत होते.

यावेळी कोल्हे म्हणाले की, समोरच्या उमेदवाराला पराभव दिसायला लागला की, दबावतंत्र वापरलं जात. पण सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हाती घेतली आहे. वैयक्तिक टीका करण्याऐवजी देशातील महागाई कमी होणार का? शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळणार का? बेरोजगार तरुणांना रोजगार मिळणार का? असे प्रश्न लोक विचारत आहेत.”
आढळराव पाटलांचा फॉर्म भरायला मुख्यमंत्री नाही, मी पहिल्यापासून सांगतोय ते डमी उमेदवार : अमोल कोल्हे

देशाच्या पंतप्रधानांना वारंवार यावं लागतंय, आमचा विजय निश्चित

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर असून शिरूर, बारामती, पुणे आणि मावळ लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने सभा घेऊन ते मोठे शक्ती प्रदर्शन करणार आहेत. याबाबत बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, आज सर्वसामान्य जनता ही इंडिया आघाडीच्या मागे उभी आहे. आज देशाच्या पंतप्रधानांना वारंवार इथे यावे लागत आहे. यातच इंडिया आघाडीचा विजय आहे.

घड्याळाला मत म्हणजे मोदींना मत, म्हणून घड्याळाला मतदान करायचं नाही ; अमोल कोल्हेंची मतदारांना साद

तो आमच्या कराचा पैसा, तुमच्या मालकीचा नाही

‘अजित पवार वारंवार निधीबाबत बोलतात, त्यांची वक्तव्ये पाहता सर्वसामान्य नागरिकांच्या करातील हा पैसा असून निधी हा कोणाच्याही मालकीचा नाही’, अशा शब्दात अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांना लक्ष्य केले. विरोधकांकडून होत असलेल्या दमदाटीबद्दल कोल्हे म्हणाले की, ‘अश्या दमदाटीला सर्वसामान्य जनता या माध्यमातून उत्तर देणार आहे. निवडणूक हातातून निसटते तेव्हा अश्या पद्धतीने दमदाटी केली जाते’.