ना मला राजकारणाची पर्वा, ना मंत्रिपद, ना आमदारकीची, पवारांच्या भेटीचं गूढ भुजबळांनी उलगडलं

मुंबई : ना मला राजकारणाची पर्वा आहे, ना मंत्रिपदाची, ना आमदारकीची, गोरगरीबांची घरं पेटता कामा नयेत, राज्य शांत राहिलं पाहिजे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीचं कारण स्पष्ट केलं. छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका सांगितली.

छगन भुजबळ काय म्हणाले?

मी शरद पवार यांच्याकडे सकाळी गेलो होतो. त्यांची अपॉईंटमेंट घेतली नव्हती. फक्त ते घरी आहेत, हे मला कळलं होतं. मी सकाळी सव्वा दहा वाजता गेलो. त्यांची तब्येत बरी नसल्याने ते झोपून होते, मी दीड तास थांबलो होतो. ते उठले आणि त्यांनी मला बोलावलं. ते बिछान्यावरच झोपलेले, मी बाजूला खुर्ची ठेवून दीड तास चर्चा केली, असं छगन भुजबळ यांनी सांगायला सुरुवात केली.

काही जिल्ह्यात स्फोटक परिस्थिती

मी सांगितलं, की मी राजकारण घेऊन आलो नाही. आमदार, मंत्री म्हणून आलो नाही. पक्षीय भूमिका माझी नाही. ओबीसींना आरक्षण देण्याचं काम तुम्ही राबवलं आणि आता राज्यात काही जिल्ह्यात स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. काही जण मराठा समाजाच्या हॉटेलात जात नाही, तर काही जण हे ओबीसी, धनगर, वंजारी या समाजांच्या दुकानात जात नाहीत. ज्येष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे, की राज्यात शांतता निर्माण झाली पाहिजे, असं भुजबळ म्हणाले.
Chhagan Bhujbal : भुजबळ पवारांच्या भेटीला, दरेकर म्हणतात, अंदाज लागत नाही, छगनरावांचं राजकारण नेहमीच सनसनाटी

शिंदेंशी बोलण्याची तयारी

मी पवारांना आठवण करुन दिली की, मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याचा प्रश्न आला होता, तेव्हाही मराठवाडा पेटला होता, तुम्ही निर्णय घेतला होतात की सरकारचं काय होईल ते होईल. त्यानंतर ते म्हणाले, आम्हाला काही माहिती नाही. जरांगे मुख्यमंत्र्यांना भेटले, काय आश्वासनं दिली माहिती नाही. लक्ष्मण हाकेंचं उपोषण सोडताना काय सांगितलंत, हे मला माहिती नाही. त्यांनी कोणाकोणाची काय मतं आहेत, हे जाणून घेतलं. ते म्हणाले की दोन दिवसात मी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी बोलतो. काय झालं, काय करायला पाहिजे, यावर चर्चा करायला तयार आहे, असं शरद पवार म्हणाल्याचे भुजबळांनी सांगितलं.
शरद पवार मिलिंद नार्वेकरांना भेटले, पण भुजबळ बसले ताटकळत; अर्धा तास उलटूनही वेटिंगवर
उद्या राहुल गांधी किंवा नरेंद्र मोदींना भेटायला पाहिजे, असं वाटलं तर मी तेही करेन. गोरगरीबांची घरं पेटता कामा नयेत. ना मला राजकारणाची पर्वा आहे, ना मंत्रिपदाची ना आमदारकीची. हे राज्य शांत राहिलं पाहिजे, अशी भूमिका भुजबळ यांनी घेतली.