नाशिकमधून शांतीगिरी महाराजांचा अर्ज; म्हणे, मी शिवसेनेचा उमेदवार; शिंदे हात जोडत म्हणाले…

मुंबई/नाशिक: लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा संपला आहे. राज्यातील १३ जागांसाठी मतदान झालेलं आहे. पण नाशिकचा तिढा महायुतीला सोडवता आलेला नाही. या जागेवर शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीचा दावा आहे. तिन्ही पक्ष दावा सोडण्यास तयान नसल्यानं नाशिकचा पेच कायम आहे. त्यातच आता अध्यात्मिक गुरु शांतीगिरी महाराजांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी अर्ज भरताना पक्षाच्या नावापुढे शिवसेनेचा उल्लेख केल्यानं संभ्रम निर्माण झाला आहे.

बाबाजी भक्त परिवाराच्या शांतीगिरी महाराज यांनी आज लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला. बाबाजी भक्त परिवारात सगळ्या पक्षांची मंडळी आहेत. आमच्या लोकसभेच्या कमिटीनं उमेदवारीबद्दलचा निर्णय घेतला आहे. भक्त परिवार आणि जनता जनार्दनाच्या वतीनं मी निवडणूक लढवतोय, असं शांतीगिरी महाराज म्हणाले.
इच्छुक झाले उदंड, सरसावले महाराज-महंत; नेत्यांना सुटेना नाशिकचं कोडं, कुठे अडलंय घोडं?
आपण शिंदे गटाकडून अर्ज भरल्याचं त्यांनी पत्रकारांना सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी आमच्या मागण्या ऐकून घेतलेल्या आहेत. ते योग्य निर्णय घेतील, असा विश्वास शांतीगिरी महाराजांनी व्यक्त केला. तुम्हाला शिवसेनेनं एबी फॉर्म दिला आहे का, या प्रश्नाला त्यांनी नकारार्थी उत्तर दिलं. पक्षानं एबी फॉर्म दिलेला नसताना तुम्ही त्यांच्याकडून अर्ज कसा भरला, असाही प्रश्न शांतीगिरी महाराजांना विचारण्यात आला. त्यावर शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण आहे. प्रभू रामाच्या हाती धनुष्यबाण असतो. प्रभू रामांची इच्छा असेल तर ते सर्वकाही व्यवस्थित करतील, असं शांतीगिरी महाराज म्हणाले.

हेमंत गोडसेंचा पत्ता कट? स्वामी शांतिगिरी महाराजांचा शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल

मुंबईत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना नाशिकमध्ये शांतिगिरी महाराज यांनी सेनेकडून अर्ज भरल्याबद्दल विचारण्यात आलं. त्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर देणं टाळलं. आता मुंबईत आहे. त्यामुळे मुंबईचं बोलतो. नाशिकचं नंतर बोलतो, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी नाशिकच्या उमेदवारीवर बोलण्यास नकार दिला. त्यांनी हात जोडले आणि कारमधून निघून गेले.