नवरा अन् लेकाला वाचवण्यासाठी धावली, विजेचा धक्का बसून आई-वडिलांसह लेकाचा मृत्यू

पुणे (दौंड) : पुण्यातील दौंड तालुक्यातील दापोडी येथे विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यात मुलगी वाचली आहे. या दुर्दैवी घटनेत आई-वडील आणि त्यांच्या मुलाचा हृदयद्रावक मृत्यू झाला आहे. सुरेंद्र देविदास भालेकर (वय ४४), पत्नी अदीका सुरेंद्र भालेकर (वय ३८), मुलगा प्रसाद सुरेंद्र भालेकर (वय १७) असं मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. ते मूळचे सोलापूर येथील राहणारे असून दापोडी येथे राहत आहेत.

आई वडिलांसह लेकाचा अंत

मिळालेल्या माहितीनुसार, भालेराव कुटुंबं हे दापोडी येथील अडसूळ यांच्या खोल्यांमध्ये राहत होते. या खोल्या पत्र्यांच्या आहेत. शेजारीच असलेल्या विजेच्या खांबाने त्याला धक्का बसला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास सुरेंद्र आंघोळीला गेले होते. टॉवेल टाकत असताना अचानक विजेच्या तारेचा धक्का बसला. त्यांच्या आवाजाने त्यांना वाचवण्यासाठी तात्काळ मुलगा प्रसाद याने धाव घेतली. त्यालाही धक्का बसला त्याचवेळी पत्नी अदीका देखील त्या ठिकाणी आल्या. त्यांना देखील विजेचा धक्का बसला. चार जणांच्या या कुटुंबातील तीन व्यक्तींना जीव गमवावा लागला आहे. कुटुंब प्रमुखासह दोघांचा जीव गेल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
Kanchanjunga Express Accident: सगळीकडे आक्रोश, रक्ताने माखलेले लोक अन् बोगीवर बोगी, प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आँखोदेखी

मुलगी क्लासला गेल्याने बचावली

सुरेंद्र हे परिसरात बांधकामाची कामे करत होते. मुलगा केडगाव येथील जवाहरलाल विद्यालयात बारावी विज्ञान शाखेत शिकत होता. पत्नी गावातील शेतात मजुरीचे काम करत होती. हे कुटुंब या परिसरात गेल्या पाच वर्षांपासून राहत होतं. या हृदयद्रावक घटनेनं दौंड तालुक्यात दुःखाचे सावट पसरले आहे. भालेकरांच्या कुटुंबातील एकमेव मुलगी वैष्णवी (वय १७) कोचिंग क्लासला सकाळीच घराबाहेर पडल्यामुळे तिचा जीव वाचला आहे.