नरेंद्र मोदीजी तुमच्यात हिंमत असेल तर… उद्धव  ठाकरेंचं थेट आव्हान

मुंबई: एका बाजूला आपण सगळे आलेलो आहोत. दुसऱ्या बाजूला सगळे गद्दार, नकली आणि भाडोत्री माणसं एकत्र आली आहेत. वक्ते भाडोत्री, उमेदवार भाडोत्री, मला असं कळलं की लोकंही तिथे भाडोत्री आणली आहेत. इथे एकाने हात वरती करुन सांगा की कोणी भाड्याने आणलं आहे का?, असा सवाल उद्धव ठाकरेंनी इंडिया आघाडीच्या सभेत केला आहे. इंडिया आघाडीच्या सभेत उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली आहे. सभेत उद्धव ठाकरेंनी अबकी बार भाजप तडीपार असा नारा दिला आहे.महाविकास आघाडीची सभा बांद्रा येथील बीकेसी मैदानात आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी इंडिया आघाडीचे नेते उपस्थित होते. यावेळी शरद पवार, उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल, मल्लिकार्जून खरगेंसह अन्य नेत्यांची सभेत उपस्थिती होती. यावेळी संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं. तसेच लोकसभा निवडणूक, महायुती रॅली, चीनचा मुद्दा अशा अनेक प्रश्नावर भाष्य केले आहे.
माझ्या तमाम… बाळासाहेबांची गर्जना उद्धव ठाकरेंकडून ऐकायचो, मात्र इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर त्यांनी ते बोलणं सोडलं – फडणवीस
उद्धव ठाकरे म्हणाले, दूर गाव मे बच्चा होता है वो सोता नही तो कहते है, गब्बर आ जायेगा. तसेच आता देशातली जनता मोदींना सांगते, आम्हाला भूक लागली. आम्हाला अन्न पाहिजे. आम्हाला नोकऱ्या आणि सुरक्षा पाहिजे. पण, मोदी म्हणतात, गप्प बसा नाही तर मुसलमान येतील. दर वेळेला काय झालं की पाकिस्तानची भीती दाखवता. मात्र बेकारीबद्दल का नाही बोलत? तुम्ही शिवसेना प्रमुखांच्या मुलाला नकली सांगता. आम्ही काय केले ते आम्हाला माहित आहे. पण, तुमची असलीयत काय आहे ती ही आम्हाला काढावी लागेल, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींना सुनावलं आहे.

हुकूमशहाची नजर कशी असते? राक्षसी? नाशिकच्या सभेमध्ये जेव्हा मोदींजींनी हिंदू-मुसलमान सुरु केलं. तेव्हा समोरचा एका शेतकऱ्याने उठून म्हटलं की, कांद्यावर बोला. तेव्हा मोदींची नजर हुकूमशाह सारखी होती. पंतप्रधान म्हणून शेतकरी तुमच्याकडे कांद्याचा हमी भाव मागतोय. कांद्याला भाव मागतोय. निर्यात बंदी मागत असताना त्यांचे न ऐकता तुम्ही भारत माता की जय! म्हणता. मोदीजी तुमची भारत माता नेमकी आहे तरी कुठे? कांदा उत्पादक शेतकरी हा सुद्धा भारत माताचा आहे. मणिपूरमध्ये ज्यांचे धिंडवडे काढले गेले त्या महिला सुद्धा भारत माताच आहेत, असं म्हणत ठाकरेंनी मोदींवर सडकून टीका केली आहे. आपण एका व्यासपीठावर येऊ या. माझी सात पिढ्यांची वंशावळ ठेवतो. मोदीजी तुमची असेल तर तुम्ही ठेवा. तुमच्या सात पिढ्याने देशासाठी काय केले ते सांगा आणि माझ्या ठाकरे घराण्याच्या पिढ्यांनी काय केले हे मी तुम्हाला सांगतो, असं थेट आव्हान ठाकरेंनी मोदींना केलं आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, ४ जूनपर्यंत पंतप्रधान बोलायला उभे राहिले आहेत. कारण ४ जूननंतर ते पंतप्रधान नसणार आहेत. ज्याप्रमाणे मोदींनी नोटबंदी जाहीर केली. त्याप्रमाणे ४ जून ला संपूर्ण देश डिमोदीनेशन करणार आहे. तुमची मुंबईत पंतप्रधान म्हणून शेवटी सभा आहे. तिकडे चीन ढेंगेमध्ये घुसलाय. पण हे भाडोत्री फौज घेऊन उद्धव ठाकरेला संपवायला आले आहेत. मोदीजी तुमच्यात हिंमत असेल तर उद्धव ठाकरेला संपवण्याचा प्रयत्न करुन पाहा. माझा महाराष्ट्र तुमचं राजकारण गाडल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अब की बार भाजप तडीपारचा नारा दिला आहे.