धनदांडगे भेटले अन् आंबेडकरांनी तासाभरात निर्णय बदलला; शेंडगेंची आंबेडकरांवर जळजळीत टीका

सांगली: मागील लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा फटका काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला बसला होता. यंदा वंचितची कामगिरी कशी असणार आणि त्याचा फटका कोणाला बसणार याची उत्सुकता आहे. सांगलीत वंचितनं आधी ओबीसी बहुजन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आणि लोकसभेचे उमेदवार प्रकाश शेंडगेंना पाठिंबा दिला होता. पण नंतर वंचितनं त्यांचा पाठिंबा काढून घेतला आणि काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटलांना दिला. आता त्यावरुन शेंडगेंनी आंबेडकरांवर निशाणा साधला आहे.

धनदांडग्या नेत्यांची भेट झाल्यावर प्रकाश आंबेडकरांनी तासाभरात निर्णय बदलला, अशा शब्दांत प्रकाश शेंडगेंनी वंचितच्या प्रमुखांवर टीका केली आहे. वंचित बहुजन आघाडी वंचितांसाठी आहे की धनदांडग्यांसाठी, असा प्रश्न निर्माण झाला असल्याचं शेंडगे म्हणाले. धनदांडगे प्रतीक पाटील प्रकाश आंबेडकरांना भेटले आणि एका तासात त्यांनी विशाल पाटलांना, सुप्रिया सुळेंना पाठिंबा दिला, असं म्हणत शेंडगेंनी आंबेडकरांच्या भूमिकेवर टीका केली.
विखेंनी खर्गेंची भेट घेतलेली! आंबेडकरांचा खळबळजनक दावा; थोरात म्हणाले, माझ्याही कानावर आलंय
ओबीसी, बहुजन, मागासवर्गीयांनी मिळून सुरू केलेली चळवळ एकत्रित चालवली तर ती चालू शकेल, अन्यथा धनदांडगे चळवळीचे लचके तोडल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी पुन्हा एकदा विचार करावा आणि आपला निर्णय मागे घ्यावा, असं आवाहनदेखील शेंडगेंनी केलं. आनंदराज आंबेडकरांनी मला सांगलीत पाठिंबा दिला असल्याचं शेंडगेंनी सांगितलं.

सांगली लोकसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत आहे. महाविकास आघाडीतून ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील, तर महायुतीकडून भाजपचे संजय काका पाटील रिंगणात आहेत. चंद्रहार पाटील यांना उमेदवारी मिळाल्यानं नाराज झालेल्या काँग्रेसच्या विशाल पाटलांनी अपक्ष अर्ज भरला आहे. त्यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी बरेच प्रयत्न करण्यात आले. पण मविआच्या प्रयत्नांना अपयश आलं. विशाल पाटलांनी बंड केलं. त्यांना वंचितनं पाठिंबा जाहीर केला आहे.