दोन पक्षांना संपवण्याच्या नादात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंनी यादी वाचली, काकांनाही उत्तर

मुंबई: दोन पक्ष संपवायचे म्हणून तुम्ही आलात, पण या प्रयत्नात तुम्ही भाजपलाच संपवलं, अशा शब्दांत ठाकरेसेनेचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं. मी पुन्हा येईन म्हणालो होतो. थोडा उशिरा आलो. पण दोन पक्ष फोडून आलो, असं विधान फडणवीसांनी केलं होतं. त्या विधानावरुन आदित्य ठाकरेंनी फडणवीसांवर टीका केली.

मूळ भाजपचे अनेक नेते आज कुठेच दिसत नाहीत. भाजपचे प्रवक्ते म्हणून जे नेते समोर दिसत आहेत, ते कुठून ना कुठून आयात करण्यात आलेले आहेत. विधानसभेचे अध्यक्षही दोन पक्ष फिरुन भाजपमध्ये गेले आहेत. आता ते तिसऱ्या पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत, असा टोला ठाकरेंनी राहुल नार्वेकर यांचं नाव न घेता लगावला. महाराष्ट्राचं वाटोळं करायचं होतं तर भाजपनं सत्ता काबीज का केली, असा सवाल त्यांनी विचारला.
कल्याण, दिंडोरीतील सभेला दांडी, मुंबईतील रोड शोलाही गैरहजर; मोदी राज्यात, अजितदादा कुठे?
भाजपचे मूळ कार्यकर्ते कुठे आहेत, असा प्रश्न विचारत आदित्य ठाकरेंनी भाजपच्या नेत्यांची यादीच वाचली. ‘पंकजा ताईंना आता उमेदवारी दिली असली तरीही त्यांच्या मनात काय खदखद आहे ती त्यांनाच विचारा. पूनम ताई कुठे आहेत ते विचारा. प्रकाश मेहता कुठे आहेत? राज पुरोहित कुठे आहेत ते विचारा. एकनाथ खडसेंच्या बाबतीत काय झालं? दोन पक्ष संपवण्यासाठी मी आलो असं तुम्ही म्हणालात.पण त्या प्रयत्नात तुम्ही भाजपलाच संपवलं’, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.
Eknath Shinde: मुंबईत ठाकरेंशी ‘सामना’, शिंदेंनी शिलेदार लावले कामाला; ‘त्रिमूर्ती’ सक्रिय, मुसंडी मारणार?
मूळ भाजप आता कुठे आहे, असा सवाल करत आदित्य यांनी सध्याच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या आकडेवारीकडे लक्ष वेधलं. ‘सध्याचे मुख्यमंत्री २०२२ मध्ये आयात केलेले आहेत. त्यांच्यासोबतचे १० आमदार मंत्री झाले. अजित पवारांसोबतचे ९ आमदार मंत्री झाले. भाजपचे १० मंत्री आहेत. त्यातले केवळ ६ मूळचे भाजपचे आहेत. स्वत:च्या अहंकारासाठी आमचं सरकार पाडलं. पण भाजपचे मूळ कार्यकर्ते आहेत कुठे?’, असा प्रश्न त्यांनी विचारला.

मनसेचे मुंबईतील ६ नगरसेवक फोडून उद्धव ठाकरेंनी फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात केली होती, असा आरोप राज ठाकरेंनी नुकताच जाहीर सभेत केला होता. या आरोपाला आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं. त्यांनी पक्ष स्थापन करुन २० वर्षे झाली. मात्र अशी एक घटना सांगा, जेव्हा आम्ही त्यांच्यावर टीका केली, असं आदित्य म्हणाले. काही नात्यांवर आपण बोलायचं नसतं, असं घरातून सांगितलं आहे. आमच्याकडे मनसेचे जे नगरसेवक निवडून आले, त्यातले काही आमदारही झाले होते. आता आमच्यातून गेलेल्या गद्दारांची जशी अवस्था झालीय, तशी परिस्थिती त्या नगरसेवकांची झाली नव्हती, असं उत्तर आदित्य यांनी दिलं.