दिग्गजांची आज मतपरीक्षा, तिसऱ्या टप्प्यात राज्यातील ‘या’ ११ मतदासंघांसाठी मतदान

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या बारामती, सोलापूरसह ११ मतदारसंघांमध्ये आज, मंगळवारी मतदान होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या निवडणूक रिंगणात उतरल्याने या दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

निवडणूक आयोगाची यंत्रणा तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी सज्ज झाली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, भाजपचे राज्यसभा सदस्य उदयनराजे भोसले, शाहू महाराज छत्रपती यांच्यासह एकूण २५८ उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा फैसला आज दोन कोटींहून अधिक मतदार घेणार आहेत.
तिसऱ्या टप्प्यात २६ हजार मतदारांचे ‘गृहमतदान’, सर्वाधिक अर्ज धाराशीवमधील, काय सांगते आकडेवारी?
राज्यातील या ११ मतदारसंघांत ११४ मतदान केंद्रे संवेदनशील असून, त्यात सातारा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे ४० मतदान केंद्रांचा समावेश आहे. राज्यातील ११ लोकसभा मतदासंघात सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होईल. गेल्या दोन टप्प्यात अपेक्षित मतदान न झाल्याने तिसऱ्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी वाढविण्याचा निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे. मतदारांना उन्हाच्या झळांचा त्रास होऊ नये, यासाठी निवडणूक आयोगाने मतदान केंद्राच्या ठिकाणी विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यात मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडतील, असा निवडणूक अधिकाऱ्यांचा विश्वास आहे. मतदानाची वेळ संध्याकाळी ६ वाजता संपत असली तरी तोपर्यंत मतदानासाठी रांगेत उभे असलेल्या मतदारांना त्यांचा हक्क बजावता येणार आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मतदानाची प्रक्रिया संध्याकाळी उशिरपर्यंत सुरू राहणार आहे.

महामुंबईत २०५ उमेदवार रिंगणात

मुंबई/ठाणे : लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई शहर, उपनगरांतील सहा जागांसाठी ११६ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये सर्वाधिक २७ उमेदवार हे मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातील आहेत. ठाणे जिल्ह्यातील तिन्ही लोकसभा मंतदारसंघांतील एकूण ९१पैकी १२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे जिल्ह्यात आता ७९ उमेदवार रिंगणात आहेत. पालघर मतदारसंघात वासंती झोप, कल्पेश भावर या उमेदवारांनी सोमवारी अर्ज मागे घेतल्याने आता १० उमेदवार उरले आहेत.

देशातील ९३ जागांवर
आज मतदान

अहमदाबाद/बेंगळुरू : देशभरातील ११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील ९३ मतदारसंघांत आज, मंगळवारी लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अहमदाबादमध्ये मंगळवारी मतदान करतील. या टप्प्यात १३०० उमेदवार रिंगणात आहेत. त्यातील १२० महिला आहेत.