दहा वर्षांत शरद पवारांनी काय केले? विट्यातील सभेत अमित शहा यांचा सवाल

म. टा. वृत्तसेवा, सांगली : ‘राज्यातील २०२ पैकी आशिया खंडातील सर्वांत मोठ्या साखर कारखान्यासह १०१ साखर कारखाने बंद पडले. राज्यातील ३६ पैकी ३२ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकावर प्रशासक नियुक्तीची वेळ आली. उपसा सिंचन योजना दीर्घ काळ रखडल्या असतील, तर तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री म्हणून शरद पवार यांनी दहा वर्षांत काय केले,’ असा सवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी उपस्थित केला.

‘जिल्ह्यात हजारो कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प आणण्याचे काम खासदार संजय पाटील करतील,’ असे आश्वासनही शहा यांनी अप्रत्यक्षपणे दिले.

सांगली जिल्ह्यातील विटा येथे सांगली मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार संजय पाटील यांच्या प्रचाराची सभा झाली. या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते.

Amit Shah: कोल्हापूर जिंकण्यासाठी अमित शहा यांची रणनीती, नाराजांना फोन करून समजूत
शहा म्हणाले, ‘एकीकडे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची चायनीज आणि दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भारतीय गॅरंटी आहे. याशिवाय इंडिया आघाडीत राहुल गांधी, शरद पवार, ममता बँनर्जी, स्टॅलिन की उद्धव ठाकरे यापैकी पंतप्रधान कोण होणार,’ असा सवाल करून शहा म्हणाले, ‘ठाकरेंच्या शिवसेनेच्या एका जोकरटाइप नेत्याने आम्ही आळीपाळीने पंतप्रधान करू, असे विधान केले आहे. त्यामुळे एका बाजूला लाखो रुपयांचे घोटाळे करणारे पंतप्रधानपदाचे दावेदार आहेत तर दुसऱ्या बाजूला सलग २३ वर्षे सक्रिय राजकारणात मुख्यमंत्री पदापासून ते पंतप्रधानपदी पोहोचल्यानंतरही दिवाळीचीही सुट्टी न घेता अखंड काम करताना जे बोलतात ते करून दाखवणारे नरेंद्र मोदी आहेत. जनतेने यामधला कोणता पर्याय निवडायचा हे ठरवावे.’

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नकली शिवसेनेचे अध्यक्ष असून, ते आता राम मंदिर, तीन तलाक, सीएए याबाबत आपली भूमिका स्पष्ट करणार नाहीत; कारण त्यांना आपल्या नव्या मतपेढीची चिंता आहे.- अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री