दहावीनंतर शिक्षण सोडलं, पालघर सोडून बोरिवलीत मुक्कामाला; मिहीर शहा नेमकं काय करतो?

मुंबई: वरळीत BMW कारने चिरडल्याने कावेरी नाखवा या महिलेचा मृत्यू झाला. या हिट अँड रन प्रकरणाने संपूर्ण मुंबई हादरलं आहे. या अपघातात चालकाने कावेरी नाखवा (वय ४५) यांना दोन किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं. ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. या घटनेतील मुख्य आरोपी शिवसेना नेता राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शहा याला पोलिसांनी तब्बल ७२ तासांनी अटक केली आहे. त्याला शहापूर येथून अटक करण्यात आली असून आज त्याला कोर्टासमोर हजर करण्यात आलं.

रविवारी (७ जुलै) पहाटे नाखवा दाम्पत्य हे कुलाब्यातील ससून डॉक येथे मासे खरेदी करायला गेले होते. ते आपल्या दुचाकीने मासे घेऊन घराकडे परतत असताना मिहीर शाहाने आपल्या भरधाव BMW कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये कावेरी त्याच्या गाडी खाली आल्या, तर त्यांचे पती प्रदीप नाखवा हे बाजुला फेकले गेले. त्यानंतरही तो थांबला नाही तर त्याने कावेरी नाखवा यांना फरफटत नेलं. त्यानंतर वरळी सी लिंकजवळ त्याने गाडी थांबवली, ड्रायव्हरने आणि त्याने मिळून डंपरमध्ये अडकलेल्या कावेरी यांना बाहेर काढलं आणि मग पुन्हा त्यांच्या अंगावर गाडी घातली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.
Mumbai Hit And Run: दादा.. नाही सोडायचं त्यांना, आदित्य ठाकरेंसमोर कावेरी नाखवांच्या मुलीचा टाहो
या भीषण घटनेनंतर मिहीर शहा हा फरार झाला होता. त्यानंतर तीन दिवसांनी पोलिसांनी त्याला शहापूर येथून अटक केली. त्याशिवाय त्याची आई, दोन बहिणींसह १२ जणांना ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांच्या चौकशीत मिहीरने हे कबुल केलं की गाडी तोच चालवत होता. तो खूप घाबरला होता म्हणून तो तिथून पळून गेला आणि गाडी चालवताना तो नशेत नव्हता.

मिहीर शहा कोण आहे?

  • मिहीर शहा हा पालघर जिल्ह्याचे शिवसेनेचे (शिंदे गट) उपनेते राजेश शहा यांचा मुलगा आहे.
  • तो २४ वर्षांचा आहे
  • त्याने दहावीपर्यंत शिक्षण घेतले आहे, त्यानंतर शिक्षण घेतले नाही.
  • बांधकाम आणि रिअल इस्टेटच्या व्यवसायात तो वडील राजेश शहा यांना मदत करत होता.

मिहीरची गाडी चालवण्याची जिद्द अन् कावेरींचा जीव गेला

अपघाताच्या काही तास आधी मिहीर त्याच्या मित्रांसह जुहूच्या एका पबमध्ये गेला होता. तिथे त्यांनी पार्टी केली आणि मग तो घरी यायला निघाला. मिहीरचा ड्रायव्हर BMW ने त्याला घरी घेऊन जात होता. ते जुहू ते मरीन ड्राइव्ह आणि मग वरळीला आले. वरळीला आल्यानंतर त्याने गाडी चालवण्याचा आग्रह धरला. मिहीर ड्रायव्हिंग सीटवर येताच काही वेळात हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मिहीरचा ड्रायव्हर राजऋषी बिदावार हा गाडी चालवत होता. हे दोघे मरीन ड्राइव्ह येथून घरी परतत होते, तेव्हा मिहीरने गाडी चालवायला घेतली. त्यानंतर त्याने नाखवा दाम्पत्याला धडक दिली.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, पबच्या मालकाने मिहीरने दारु प्यायली नसल्याचं सांगितलं. त्याने फक्त रेड बुल प्यायले असं पब मालकाने सांगितलं. तर मिंटच्या वृत्तानुसार, आरोपी मिहीर आणि त्याच्या मित्रांनी या पबमध्ये १८,००० रुपये खर्च केले होते.

मिहीर शहावर भारतीय न्याय साहित्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ज्यात कलम १०५ , २८१ (भरधाव आणि निष्काळजीपणे वाहन चालवणे मानवी जीवन धोक्यात आणणे), १२५-बी (जीवन आणि वैयक्तिक सुरक्षा धोक्यात आणणे), २३८, ३२४ (४) (नुकसान आणि नुकसान होण्यासाठी गैरप्रकार करणे) यांचा समावेश आहे.