दलित, आदिवासी, मुस्लिमांनी काँग्रेसपासून सावध राहावे : प्रकाश आंबेडकर

मुंबई : ‘दलित आणि बौद्धांना जेव्हा आवश्यकता होती, तेव्हा महाविकास आघाडी गैरहजर होती. त्या वेळी वंचित बहुजन आघाडीने ठाम उभे राहून दलित आणि बौद्धांसाठी लढा दिला. दलित, आदिवासी, ओबीसी आणि मुस्लिम यांनी काँग्रेसपासून सावध राहावे,’ असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

‘आरक्षणाच्या सर्वपक्षीय बैठकीकडे महाविकास आघाडीने पाठ फिरवली. मात्र, मराठा आणि ओबीसी आरक्षणाचे ताट वेगळे असावे, अशी स्पष्ट भूमिका ‘वंचित’ने मांडली,’ असेही आंबेडकर म्हणाले.काँग्रेसच्या भूमिकेबद्दल ‘वंचित’चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ‘एक्स’च्या माध्यमातून भूमिका स्पष्ट केली.

काँग्रेसच्या किमान आठ आमदारांनी ‘क्रॉस वोटिंग’ केले

‘महाविकास आघाडीने महाराष्ट्रात लोकसभा आणि विधान परिषद निवडणुकीत एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही. याउलट वंचित बहुजन आघाडीने लोकसभेत सहा मुस्लिम उमेदवार दिले,’ असे आंबेडकर म्हणाले. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या किमान आठ आमदारांनी भाजपच्या नेतृत्वातील महायुतीला ‘क्रॉस वोटिंग’ केले. वंचित बहुजन आघाडी भाजप-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात ठामपणे उभी आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले.

संविधानावर खरचं प्रेम असेल, तर नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांनी मनुस्मृती जाळावी – प्रकाश आंबेडकर

भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचे संविधानावर खरोखरच प्रेम असेल तर मी नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांना मनुस्मृतीच्या प्रती जाळण्याची मागणी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत केली आहे. ॲड. आंबेडकर यांनी म्हटले की, भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांनी संविधानावर वार केले आहेत. तसेच, वेळोवेळी उपेक्षित, वंचित जाती आणि समाजाचे शोषण केले आहे. बाबासाहेबांचे आदर्श आणि संविधानातील मूल्यांना काँग्रेस आणि भाजपने भ्रष्ट केले असल्याचेही आंबेडकर म्हणाले.