ताम्हिणीत पर्यटकाचा मृत्यू; धबधब्यात पाण्याचा अंदाज न आल्याने अपघात, महिन्यातील दुसरी घटना

प्रतिनिधी, पुणे : ताम्हिणी येथील मिल्की बार धबधबा येथे पाण्याचा अंदाज न आल्याने पर्यटकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी घडली. याच ठिकाणी पर्यटकाचा मृत्यू झाल्याची ही महिनाभरातील दुसरी घटना आहे.

काय घडलं?

ताम्हिणी परिसरातील प्लस व्हॅलीमधील मिल्की बार धबधबा येथे पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने आदेश जितेंद्र पवार (वय २१, रा. वडगाव धायरी, मूळ रा. जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. धबधब्यामध्ये तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच मृतदेह बाहेर काढण्यासाठी लोणावळ्यातील शिवदुर्ग संघ, माणगाव आपत्ती व्यवस्थापन, रोहा आपत्कालीन पथक, मुळशी आपत्ती व्यवस्थापनाचे तरुण, वनविभाग, पोलिस आणि ‘गिरीप्रेमी’चे वरुण भागवत, मिहीर जाधव यांनी घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन केले.

आदेश नाशिकच्या मित्रांबरोबर पर्यटनासाठी गेला होता. धबधब्याला भरपूर पाणी असल्याने पोहताना अंदाज न आल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. खोल दरीमध्ये मृतदेह असल्याने बचावकार्यही अनेक तास सुरू होते. रात्री अकरा वाजता मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला, अशी माहिती बचाव पथकांकडून देण्यात आली.

धाडस न करण्याचे आवाहन

‘समाजमाध्यमांवरील ‘रील्स’ पाहून ही मित्रमंडळी पर्यटनासाठी आली होती. नागरिकांनी समाजमाध्यमांवरील आशय पाहून पर्यटन करण्याचे धाडस करू नये. ताम्हिणी घाट आणि परिसरातील रस्ते निसरडे झाले असून, स्थानिक किंवा परिसराची माहिती असणारी व्यक्ती सोबत असावी,’ असे आवाहन बचाव पथकांनी केले आहे.
पावसाळी पर्यटन नियमातच! वनविभागाने आखली लक्ष्मरेषा; नियम मोडल्यास थेट होणार कारवाई
महिन्यातील दुसरी घटना

पावसामुळे सध्या नागरिक मोठ्या प्रमाणावर पर्यटनासाठी बाहेर पडत आहे. पुण्याजवळील किल्ले, धबधबे, घाटरस्ते येथे पर्यटकांची गर्दी वाढण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, पर्यटकांच्या अतिधाडसामुळे दुर्घटना घडत आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात काही पर्यटक या धबधब्यात वर्षा सहलीसाठी गेले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने एका तरुणाचा दरीत पडून मृत्यू झाला होता.

सप्टेंबरअखेरपर्यंत धबधबा बंद

पावसाचा वाढलेला जोर, पाण्याची वाढती पातळी आणि निसरड्या वाटांमुळे ताम्हिणी अभयारण्यातील मिल्की बार धबधबा सप्टेंबरअखेरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय वन विभागाने घेतला आहे. ‘मागील काही वर्षांत समाजमाध्यमांवरील छायाचित्रे आणि व्हिडिओंमुळे हा धबधबा लोकप्रिय झाला असून, दर वर्षी पावसाळ्यात पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. धबधब्याच्या वाटा निसरड्या आणि तीव्र उताराच्या असल्यामुळे अपघात होत आहेत. महिनाभरात दोन पर्यटकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. या पार्श्वभूमीवर पर्यटकांची सुरक्षा लक्षात घेता धबधबा बंद ठेवण्यात येणार आहे,’ अशी माहिती विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) स्नेहल पाटील यांनी दिली.