…तर माझी कावेरी वाचली असती हो! पतीचा काळीज पिळवटून टाकणारा टाहो; आक्रोश ऐकून उपस्थित सुन्न

मुंबई: वरळीतील हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहाचा शोध सुरु आहे. वरळीतील ऍट्रिया मॉलजवळ मिहीरनं एका दुचाकीला धडक दिली. या दुचाकीवर नाखवा दाम्पत्य होतं. अपघातात प्रदिप नाखवा जखमी झाले. सुदैवानं त्यांचा जीव वाचला. पण त्यांच्या पत्नी कावेरी तितक्या सुदैवी नव्हत्या. अपघात होताच मिहीरनं कार आणखी वेगात दामटवली. त्यामुळे कावेरी फरफटत गेल्या. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्यात त्यांचा मृत्यू झाला.

मिहीर शहानं अपघातानंतर कार वेगात पळवली. त्यानं वरळी सी लिंकवरुन वांद्रे गाठलं. त्यानंतर कार वांद्रे पूर्वेतील कलानगरात सोडली. वडील राजेश शहांना फोन करुन त्यानं घटनाक्रम कथन केला. यानंतर त्यानं मोबाईल बंद केला. सकाळी ८ पर्यंत तो गोरेगावात त्याच्या प्रेयसीच्या घरात होता. हिट अँड रन प्रकरणाच्या बातम्या टीव्हीवर सुरु होताच मिहीर तिथून निघाला. वांद्र्यात मित्राच्या घरी जातो, असं त्यानं प्रेयसीला सांगितलं. पोलिसांनी प्रेयसीचा जबाबही नोंदवला आहे. मिहीरचा शोध सुरु आहे. त्याचे वडील राजेश शहा शिंदेसेनेचे उपनेते आहेत.
Mumbai Hit and Run: रात्री मित्रांसोबत बारमध्ये, पहाटे BMW दामटवली; दाम्पत्याला उडवणारा मिहीर शहा कोण?
प्रदीप नाखवांनी काय सांगितलं?
आम्ही दोघे दुचाकीवरुन घरी परतत होतो. त्यावेळी पाठीमागून कारनं जोरदार धडक दिली. मी खालो पडलो. माझी पत्नी माझ्या पाठीवर आदळली. त्यामुळे तिला जास्त दुखापत झाली नव्हती. पण चालकानं कारचा वेग वाढवला आणि तिला फरफटत नेलं, असं अपघातातून बचावलेल्या प्रदिप नाखवा यांनी सांगितलं. मी चालकाकडे कार थांबवण्याची विनंती अनेकदा केली. पण त्यानं माझं काहीच ऐकलं नाही. त्यानं वेळीच ब्रेक दाबला असता, तर माझी कावेरी वाचली असती, असं म्हणत प्रदिप यांनी टाहो फोडला.

अपघातात किरकोळ जखमी झालेले प्रदिप सकाळपासून पोलीस ठाण्यात होते. माध्यमांशी बोलताना त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. ‘पहाटे साडे पाचच्या सुमारास अपघात झाला. मी कसाबसा वाचलो. पण माझ्या कावेरीला त्यानं फरफटत नेलं. ती मला सोडून गेली. मला २ मुलं आहेत. मी आता काय करु? ही मोठी माणसं आहेत. त्यांना काहीही होणार नाही. त्रास आम्हालाच होणार,’ असं म्हणत त्यांनी हतबलता व्यक्त केली.