‘…तर भाजपचे अस्तित्व राहणार नाही’, राज्यघटना बदलण्याच्या आरोपावरुन खर्गेंचा इशारा

प्रतिनिधी, मुंबई :‘केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना तुरुगांत टाकण्याचे काम केले; पण देशात बांगलादेश आणि पाकिस्तानसारखी परिस्थिती होऊ देणार नाही. भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि नरेंद्र मोदींनी लाख प्रयत्न केले, राज्यघटना आम्ही बदलू देणार नाही. भाजपने तसे प्रयत्न केल्यास त्यांचे अस्तित्वच शिल्लक राहणार नाही,’ असा इशारा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शुक्रवारी दिला. ‘सब का साथ, सब का विकास’ म्हणणाऱ्या भाजपने ‘सब का सत्यानाश’ केला, अशी टीकाही त्यांनी या वेळी केली.महाविकास आघाडीच्या मुंबईतील परिवर्तन सभेत खर्गे बोलत होते. ‘काँग्रेस आघाडीचे सरकार आले तर तुमच्या दोन एकर जमिनीतून तर एक एकर मुस्लिमांना देतील, दोन म्हशी असतील तर त्यातील एक मुस्लिमांना देतील ही पंतप्रधानाची भाषा आहे का? ज्या दिवशी मुस्लिमांच्या विरोधात बोलेन त्या दिवशी सार्वजनिक जीवनातून निवृत्त होईन असे एकीकडे म्हणायचे व दुसऱ्याच दिवशी पुन्हा हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करायची. नरेंद्र मोदी एससी, एसटी, मागास समाजाला काहीही देऊ इच्छित नाहीत. ३० लाख सरकारी पदे रिक्त आहेत; पण मोदींनी जागा भरल्या नाहीत. महागाई, बेरोजगारीवर ते बोलत नाहीत. मोदी पुन्हा सत्तेत येणार नाहीत तर ‘इंडिया’ ३०० जागा जिंकून सत्तेत येईल,’ असा विश्वास खर्गे यांनी व्यक्त केला.
Girish Mahajan : नाशकात दगाफटका झाला, तर माना खाली घालाव्या लागतील, गिरीश महाजनांची पदाधिकाऱ्यांना तंबी

‘पंतप्रधान मोदींना खुर्चीची चिंता’

‘निवडणूक प्रचार सुरू झाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात सभांवर सभा घेतल्या. ते मागील १० वर्षांत काय केले हे सांगत नाहीत. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत; पण मोदींनी त्याबद्दल एक शब्दही काढला नाही. राज्यातील उद्योग गुजरातला नेऊन तरुणांना बेरोजगार केले. मोदींना खुर्चीची चिंता आहे,’ अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी केली.

‘पंतप्रधानांची मुंबईतील शेवटची सभा’

‘नरेंद्र मोदी सध्या देशाचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम पाहत असून, त्यांची मुंबईतील शुक्रवारची सभा ‘पंतप्रधान’ म्हणून अखेरची सभा आहे,’ असा दावा शिवसेना (उबाठा) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला. ‘मोदी गेले काही दिवस महाराष्ट्रात मुक्कामी असून ‘इंडिया’ने त्यांना अक्षरशः रस्त्यावर आणले. ४ जूननंतर तुम्हाला आवडता झोला घेऊन हिमालयाला घेऊन जायची व्यवस्था महाराष्ट्र करील,’ असा टोला त्यांनी या वेळी लगावला. ‘मोदींनी शिवसेना तोडली. त्यांनी बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर जाऊ नये. बाळासाहेबांचा आत्मा त्यांना शाप देईल,’ असे राऊत म्हणाले.