डॅमेज कंट्रोलसाठी शिंदे सरकारचा नामी फंडा, प्रभावहीन मंत्र्यांची मंत्रिमंडळातून उचलबांगडी

प्रतिनिधी, मुंबई : लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवातून बाहेर पडण्यासाठी तसेच आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्रिमंडळ विस्तार करून ‘डॅमेज कंट्रोल’ केले जाणार असल्याचे समजते. केंद्रातील सत्तास्थापनेनंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराला गती येणार असल्याचे समजते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुलै २०२२ मध्ये शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळाचा तीन वेळा विस्तार झाला आहे. एक मंत्रिमंडळ विस्तार केवळ अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटातील मंत्र्यांना संधी देण्यासाठी झाला. त्यावेळी शिवसेनेतील अनेक इच्छुकांना मंत्रिपदे मिळाली नाहीत.

संजय शिरसाट, बच्चू कडू, भरत गोगावले आदींची नावे त्यावेळी चर्चेत राहिली. परंतु त्यांना संधी अजूनही मिळालेली नाही. अशात आता लोकसभा निवडणूक निकालात भाजपला सर्वाधिक फटका बसला आहे. अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना तसेच राज ठाकरे यांची मनसे सोबत असताना महायुतीचा प्रभाव पडला नाही. या पार्श्वभूमीवर, एकूणच आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याआधी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे समजते.

यावेळी काही नेत्यांना संधी मिळणार असली, तरी राज्यातील पराभवाची जबाबदारी निश्चित करत ज्या नेत्यांना त्यांच्या परिसरात प्रभाव पडता आला नाही, त्यांची गच्छंती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Kirit Somaiya : आम्ही बांगलादेशींमुळे हरलो, आकडे दाखवत ठाकरेंच्या सेनेवर घाव, सोमय्यांचा रडीचा डाव
एनडीएने केंद्रात सत्ता स्थापन केल्यानंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता आहे. आता शेवटच्या सहा महिन्यांसाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून कोणाला मंत्रिपदाची संधी मिळते, याकडे सर्व आमदारांचे लक्ष लागले आहे.

विधानसभेसाठी अजितदादा गटात हालचाली

दुसरीकडे, लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये भाजप-शिवसेना शिंदे गटाचा पराभव झाल्याने महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी (अजित पवार गट) काँग्रेसची एकीकडे धाकधूक वाढली असताना, दुसरीकडे आशाही पल्लवित झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातील आठ ते दहा जागांवर दावा करण्याची तयारी पक्षाने केल्याचे चित्र आहे.
Devendra Fadnavis : भाजपला शिंदे-अजितदादांचा राजीनामा हवाय? फडणवीसांच्या ‘नैतिक दबावा’च्या नाटकाचा आरोपRead Latest Maharashtra News Updates And Marathi News

नाशिक जिल्ह्यात विद्यमान खासदार नसल्याने अजित पवार गटाला लोकसभेची उमेदवारी मिळण्याची अपेक्षा नव्हती. त्यामुळे निवडणूक जाहीर होऊनही पक्षात फारशी हालचाल नव्हती; पण मंत्री छगन भुजबळ यांनी अचानक नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादीचा दावा सांगितला. पुढे खुद्द अमित शहा यांनी नाशिकची उमेदवारी भुजबळांना देण्याच्या सूचना केल्याची चर्चा पुढे आली. मात्र, महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर होऊन ३७ दिवस उलटूनही महायुतीकडून भुजबळ यांच्या उमेदवारीची घोषणा झाली नाही. हा अपमान वाटून भुजबळ यांनी स्वत:च पत्रकार परिषद घेऊन आपली माघार जाहीर केली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटातील उत्साह औटघटकेचा ठरला.