डिझेल टाकून मृतदेह जाळला, हाडे अन् राख पोत्यात भरून नदीत, पुण्यात जावयाला संपवलं; कारण…

प्रतिनिधी, पुणे (पिंपरी) : एका प्रेमी युगलाने सहा महिन्यांपूर्वी पळून जाऊन आंतरधर्मीय विवाह केला. मात्र, मुलीच्या घरच्यांना हा विवाह मान्य नसल्याने आणि आपली मुलगी पळवून नेल्याचा राग डोक्यात असल्याने त्यांनी डोक्यात दगड घालून जावयाचा खून केला. जावयाचा मृतदेह दोन दिवस जंगलात लपवून ठेवला. त्यानंतर डिझेल टाकून मृतदेह जाळला आणि मृतदेहाची हाडे आणि राख पोत्यात भरून नदीत टाकून दिली. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक केली आहे.अमीर महंमद शेख (वय २५, रा. आदर्शनगर, मोशी, मूळ गाव रांधे, ता. पारनेर, जि. नगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी मृत अमीरचे वडील महंमद कासिम शेख (वय ५०) यांनी भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मृत अमीर याच्या पत्नीचा भाऊ सुशांत गायकवाड (वय २२, रा. रांधे, ता. पारनेर), बहिणीचा नवरा पंकज पाईकराव (वय २८, रा. मार्तंडनगर, चाकण) आणि चुलत भाऊ गणेश गायकवाड (वय २२, रा. रांधे, ता. पारनेर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mumbai Coastal Road: हाजी अली ते वरळी उद्यापासून? सागरी किनारा मार्गाचा आणखी एक टप्पा खुला होणार

पोलिसांनी सुशांत आणि पंकज या आरोपींना अटक केली आहे. अमीरला जाळण्यासाठी डिझेल उपलब्ध करून दिल्याप्रकरणी सुनील चक्रनारायण (वय ३३, रा. चाकण) याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत अमीर शेख आणि निकिता गायकवाड यांनी सहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला. या विवाहाला निकिताच्या घरच्यांचा विरोध होता. निकिता आणि अमीर मोशी येथे राहतात. अमीर एका कंपनीत काम करतो. १५ जून रोजी ‘अमीर कंपनीत कामाला जातो,’ असे सांगून घरातून बाहेर पडला. मात्र, तो पुन्हा घरीच न आल्याने निकिता उर्फ अरिना अमीर शेखने १६ जून रोजी भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. मुलगा घरी न आल्याने वडील महंमद शेख यांना निकिताच्या घरच्यांवर संशय आला. त्यांनी २७ जून रोजी भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी पंकजला नगर येथून अटक केली. १५ जून रोजी सुशांत आणि गणेश यांच्या मदतीने अमीरचा डोक्यात दगड घालून खून केल्याची कबुली पंकजने चौकशीत दिली. पोलिसांनी पंकज आणि सुशांत यांना अटक केली; गणेशचा शोध सुरू आहे.

मुलीला पळवून नेऊन विवाह केल्याचा राग मुलीच्या घरच्यांना होता. या रागातून निकिताच्या दोन भावांनी आणि बहिणीच्या नवऱ्याने अमीर शेखचा खून केला. दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, फरारी आरोपीचा शोध सुरू आहे.

– गणेश जामदार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, भोसरी एमआयडीसी