ठाकरे काळात ‘निधी न देणारे’ दादा पुन्हा सत्तेत सोबत, केसरकर म्हणतात, तेव्हाचे अजित पवार…

मुंबई : ‘महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री असूनही उद्धव ठाकरे मातोश्रीतच असायचे. त्यावेळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभर स्वत:ला हवी तशी कामे करायचे. याद्वारे काँग्रेसने शिवसेना गिळंकृत करण्याचाच डाव मांडला होता. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी बंड केले व त्यात आम्ही सहभागी होत महायुतीद्वारे सत्ता स्थापन केली’, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे प्रवक्ते व राज्यातील मंत्री दीपक केसरकर यांनी मंगळवारी केला. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ‘मटा कॅफे’ या कार्यक्रमात त्यांनी हे मत मांडले.

‘२०१९ मध्ये राज्यातील मतदारांनी युतीला कौल दिला होता. त्यावेळी काही विषयांवर वाद असल्यास बसून चर्चा करू, असे आम्ही म्हटले होते. मात्र, भाजप व शिवसेनेची विचारसरणी एक आहे. शिवसेना व काँग्रेस यांची विचारसरणी एक होऊ शकत नाही, असे आमचे म्हणणे आहे. तसे असताना उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी करण्याचे ठरवले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एका शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदी बघायचे आहे, असे म्हटले होते. उद्धव ठाकरे स्वत: मुख्यमंत्री झाले. कदाचित त्यावेळी ती शरद पवारांच्या प्रभावात आले. त्यांच्यात असा प्रभाव टाकण्याची क्षमता आहे. उद्धव हे त्यावेळी स्वत: मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना आणखी वाढली असती, हे नक्की’, असे केसरकर म्हणाले.
Devendra Fadnavis : ठाकरे मराठी मतांवर जगण्याच्या मन:स्थितीत नाहीत, मुस्लिम मतांवर गुजराण, फडणवीसांचा हल्लाबोल
‘शिंदे यांच्यावर त्यावेळी खूप अन्याय झाला. त्यांचे राजकारण संपविण्याचा डाव आखण्यात आला होता. त्याचवेळी महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात एकही फाइल पुढे सरकली नाही. आमदारांना निधी मिळत नव्हता. एका अर्थसंकल्पात आमदारांनी निधी न मिळाल्यास सरकारविरुद्ध मतदानाचा इशारा दिला होता. त्यानंतर काही प्रमाणात अर्थसंकल्पात निधी मिळाला होता. शिंदे यांनी जे पाऊल उचलले त्याची ही पार्श्वभूमी होती. तरीही उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आजही आदर आहे. केवळ त्यांचे निर्णय चुकले. परंतु शिंदे यांनी बंड पुकारून सत्ता स्थापन केल्यामुळे आज उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडून प्रचार करताहेत, हे महत्त्वाचे आहे’, असे त्यांनी नमूद केले.
Amit Shah : भाजपात निवृत्ती वय ७५? सप्टेंबर २०२५ मध्ये तुम्ही पंतप्रधान? अमित शाह म्हणाले, वेगळ्या परिस्थितीत…Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
ज्या अजित पवारांच्या अर्थ खात्याकडून शिवसेना आमदारांना निधी मिळत नसल्याचा आरोप होता, मग आता तेच अजित पवार आता सत्तेत आहेत, याबाबत दीपक केसरकर म्हणाले, ‘तेव्हाचे अजित पवार हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सांगण्यानुसार चालायचे. आता तसे नाही. आता ते स्वतंत्र असल्यानेच ते आमच्यासोबत आहेत. शरद पवार हे अत्यंत धुरंदर राजकारणी आहेत. आजवर शिवसेना चारवेळा फुटली. त्या चारही वेळेस शरद पवार हेच त्या फुटीच्या केंद्रस्थानी होते’, असा आरोप त्यांनी केला.