ठाकरेंची एनडीएत येण्याची इच्छा, PM मोदींना भेटण्यासाठी निरोप पाठवतायत; दीपक केसरकरांचा खळबळजनक दावा

मुंबई : ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडीत अर्थात एनडीएमध्ये येण्याची इच्छा असून त्यासाठी ते विविध नेत्यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निरोप पाठवत आहेत’, असा दावा शिवसेनेचे प्रवक्ते आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी केला. त्याचवेळी उशिरा जाहीर झालेल्या जागांमुळे आपल्या पक्षाला नुकसान झाल्याची कबुलीही केसरकर यांनी यावेळी दिली.

प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हा दावा केला. ‘गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्याकडून पंतप्रधान मोदी यांना भेटण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. उद्धव ठाकरे यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएमध्ये यायचे आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे हे विविध लोकांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत निरोप पाठवत आहेत’, असा दावा त्यांनी केला. यावेळी दीपक केसरकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भात भाष्य केले. महाराष्ट्रात निघालेले फतवे व उशिरा जाहीर झालेल्या जागांमुळे आम्हाला नुकसान झाल्याची कबुली केसरकर यांनी यावेळी दिली. मात्र, आम्ही आता विधानसभेला जास्त काळजी घेऊ. आम्हाला विधानसभा निवडणुकीत अपेक्षित जागा मिळतील, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. दरम्यान निकाल लागायच्या आधीची केसरकर यांनी अशाप्रकारचे वक्तव्य केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
अजितदादांच्या राष्ट्रवादीने अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या ३ जागा जिंकल्या
शिरसाट यांची राऊतांवर टीका

लोकसभा निवडणुकीसंदर्भात बहुतेक मतदानोत्तर चाचण्यांमध्ये भाजपप्रणित एनडीए आघाडीची सरशी होणार असल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. ‘मतदानोत्तर चाचण्यांनंतर संजय राऊतांना भेटायला जाताना हेल्मेट घालून जा. ते दगड मारतील. पिसाळलेला कुत्रा कोणालाही चावू शकतो’, असे उद्गार संजय शिरसाट यांनी काढले. तसेच या चाचण्यांच्या आकड्यावर जाऊ नका. महाराष्ट्रात शिवसेनेच्या ११ ते १२ जागा निवडून येतील, असा विश्वास शिरसाट यांनी व्यक्त केला.