ज्योतिषी म्हणून बसलोय का? राज ठाकरेंचा प्रतिप्रश्न; ‘सायलेंट’ फॅक्टर प्रश्नावर काय घडलं?

मुंबई: राज्यात आज पाचव्या टप्प्यातलं मतदान होतंय. मुंबईतील सर्व जागांसह राज्यातील एकूण १३ मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी दादरच्या बालमोहन विद्यामंदिरात सहकुटुंब मतदान केलं. यावेळीही राज ठाकरेंच्या पक्षाचा एकही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नाही. गेल्या निवडणुकीत भाजपविरोधात थेट भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंनी यंदा महायुतीला पाठिंबा दिला. त्यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभाही घेतल्या.

राज्यातील १३ लोकसभा मतदारसंघात पहिल्या तास दोन तासांमध्ये म्हणजेच सकाळी ७ ते ९ या वेळेत सरासरी ६.३३ टक्के मतदान झालं आहे. मतदानाचा टक्का वाढायला हवा. सध्या ऊन जास्त आहे. मतदार बाहेर पडतील आणि त्यांचा हक्क बजावतील, असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी काय आवाहन कराल, असा प्रश्न राज यांना विचारण्यात आला. त्यावर काही नाही तेच आपलं घिसंपिटं वाक्य, मतदानाचा हक्क बजवा, असं मिश्किल उत्तर राज ठाकरेंनी दिलं.
Mumbai North East Lok Sabha: ते काय मशीन घेऊन फिरत नव्हते! राऊतांचे बंधू तापले, पोलिसांशी वाद; ठाकरेसेनेचे दोघे ताब्यात
लोकसभा निवडणुकीत महिला मतदार टर्निंग पॉईंट ठरतील का? त्या सायलेंट फॅक्टर असतील का? असे प्रश्न पत्रकारांनी विचारले. त्यावर राज यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलं. मला माहीत नाही रे. मी काय भविष्यवेत्ता नाहीए रे.. मी काय ज्योतिषी म्हणून बसलोय का?, असा प्रतिपश्न राज यांनी केला. यानंतर राज ठाकरे त्यांच्या कुटुंबासह मतदान केंद्रातून निघाले.

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी वांद्र्यात मतदान केलं. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना केंद्र सरकारवर निशाणा साधला. मतदार जुमलेबाजीला त्रासले आहेत. आपला मतदान हक्क यापुढेही अबाधित राहावं यासाठी लोक बाहेर पडलेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. आता पैसे घेऊन आपल्याला विकायला कोणी तयार नाही, असं त्यांनी म्हटलं.