जाहीरनामा किती विश्वासार्ह? राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षावर फडणवीसांची सडकून टीका

प्रतिनिधी, पुणे : ‘लोकसभेच्या ५४२ जागांपैकी दहा जागा लढविणाऱ्या पक्षाच्या जाहीरनाम्याला काय अर्थ आहे? ते जाहीरनामा प्रसिद्ध करतात आणि अमुक करणार, तमुक करणार असे सांगतात, त्यावर कोणाला तरी विश्वास बसेल का,’ असा टोला लगावून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जाहीरनाम्यावर टीका केली.

फडणवीस हे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पुण्यात आले होते. या वेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना ‘राष्ट्रवादी’च्या जाहीरनाम्यावर नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, ‘महायुतीचा जागांचा तिढा जवळजवळ सुटला असून, आज-उद्या उर्वरित जागांचा निर्णय जाहीर केला जाईल. राज्यात, देशात सगळीकडे ‘मोदीं’ची हवा आहे.’ राज्यातही गेल्यावेळेसपेक्षा अधिक जागा या महायुतीला मिळतील, असे भाकीत व्यक्त करताना नेमक्या किती जागा, याबाबत भाष्य करणे त्यांनी टाळले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार; तसेच इतर सर्व घटकपक्ष सोबत असून, महायुतीमध्ये सर्व आलबेल असल्याचे ते म्हणाले.

‘बारामती’त सुनेत्रा पवारच?

बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंना निवडून देणे म्हणजे काँग्रेस नेते राहुल गांधींना निवडून देण्यासारखे आहे. सुनेत्रा पवारांना मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींना विजयी करणे, हे बारामतीच्या जनतेला माहिती आहे. बारामतीची जनता मोदींच्या पाठीशी असून, बारामतीत सुनेत्रा पवारच निवडून येतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

‘राज्यघटने’ला कोणीही हात लावू शकत नाही

‘राज्यात ७० वर्षे काँग्रेसचे सरकार होते, त्यांनी काश्मीरमध्ये भारताच्या राज्यघटनेची अंमलबजावणी का केली नाही, देशात आणीबाणी लागू करून राज्यघटनेशी कोण खेळले, काँग्रेसचे दक्षिण गोव्याचे उमेदवार म्हणतात, की गोव्यात भारताच्या राज्यघटनेची अंमलबजावणी होता कामा नये, या सर्व प्रश्नांची उत्तरे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आधी द्यावीत आणि त्यानंतर राज्यघटनेबाबत भाजपवर बोलावे. चहा विकणारा मुलगा देशाचा पंतप्रधान होतो, हे केवळ राज्यघटनेमुळे शक्य झाले आहे. या देशात जोपर्यंत मोदी आणि भाजप आहे, तोपर्यंत राज्यघटनेला कोणी हात लावू शकणार नाही,’ असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ही लढाई पवार विरुद्ध पवार, मात्र सुनेत्रा वहिनींच होणार लोकसभेवर सवार… सभेत रामदास आठवलेंची भन्नाट शायरी
देशात मोदींचाच ‘करंट’

राज्यात मोदींची हवा असून, महायुतीला अभूतपूर्व यश मिळणार आहे. जनता महायुतीच्या पाठीशी आहे. विरोधकांना कायमच ‘अंडर करंट’ दिसत असतो; कारण ‘करंट’ मोदीजींचा असतो.

पुण्यात प्रचंड प्रतिसाद

‘महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या अर्ज भरण्याच्या पदयात्रेला आलेला जनसमुदाय पाहता पुणेकरांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसते आहे. दिवंगत खासदार गिरीश बापट यांनी शहरात चांगले काम केले. महायुतीनेही मोहोळ यांच्या रूपाने तरुण, तडफदार, माजी महापौरांना उमेदवारी दिली आहे. समान पाणीपुरवठा योजना, मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प, विमानतळाचे विस्तारीकरण, मेट्रो, ‘पीएमपी’ बस, मुळा-मुठा नद्यांचे परिवर्तन, ‘एटीएमएस’ योजना आदी प्रकल्प राबवले असून, पुणे कसे बदलले, हे पुणेकर पाहत आहेत,’ असे देवेंद्र फडणवीस या वेळी म्हणाले.