देवेंद्र फडणवीस यांचे मुद्देसुद उत्तर काय?Image Credit source: गुगल
देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निर्भेळ नसल्याचा आरोप केला होता. त्यांनी विविध वृत्तपत्रात याविषयीचा लेखच लिहिला. त्यात महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये मॅच फिक्सिंग होण्याची भीती व्यक्त केली होती. त्यांनी लेख लिहिला होता. त्याला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. त्यांनी पुराव्यांसह सर्व आरोप खोडून काढले. ज्या 3 वृत्तपत्रांत राहुल गांधींचे लेख आले, त्याच 3 वृत्तपत्रांत फडणवीसांचेही लेख छापून आले आहेत.
पराभवाचे चिंतन करा
लेखाची सुरुवात गडचिरोली दौर्यापासून बंदुक घेतलेला नक्षलवादी संपविणे सोपे, पण अर्बन नक्षली मानसिकता संपवायला वेळ लागेल. भारत जोडोच्या नावाखाली चालविलेल्या भारत तोडो अभियानात किती डॉ. मनमोहन सिंग यांनी ठरविलेल्या किती नक्षली संघटना होत्या, याचे करुन दिले स्मरण फडणवीसांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत 19 डिसेंबर 2024 रोजी केलेल्या भाषणाचे त्यांनी स्मरण करुन दिले. एकदा पराभव स्वीकारुन आपण कुठे चुकतो आहोत, जनतेशी आपला कनेक्ट कुठे कमी पडतो, त्यासाठी काय केले पाहिजे, याचा विचार केला तर ते अधिक संयुक्तिक ठरेल असा सल्ला फडणवीस यांनी राहुल गांधींना दिला. बिहारसह आगामी विधानसभा निवडणुकांच्या पराभवाची कारणेही त्यांना आतापासून तयार करायची आहेत, असा टोला ही त्यांनी लगावला. यावेळी फडणवीस यांनी त्यांना मुद्देसूद उत्तरं दिली.
मुद्दा पहिला : मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती
1950 पासून नवीन कायदा अस्तित्वात येईस्तोवर मुख्य निवडणूक आयुक्त तुमच्या काँग्रेस सरकारने थेट नियुक्त केले. आतापर्यंतच्या 26 पैकी 25 आयुक्त तुम्ही केंद्र सरकारकडून थेट नेमले. पहिल्यांदा मोदीजींनी त्यात विरोधी पक्षनेता किंवा सर्वांत मोठ्या राजकीय पक्षाचा नेता असलेली समिती नियुक्त केली. पण, लोकशाहीला भक्कम करणारे आणि तुमच्या काळात कधीही पाळले न गेलेले पाऊल तुम्हाला आवडलेले दिसत नाही, असा टोला फडणवीस यांनी राहुल गांधींना लगावला.
दुसरा टप्पा : मतदारवाढीचा
विधानसभा निवडणुकीत 40,81,229 मतदारांपैकी 26,46,608 मतदार हे युवा मतदार होते. नवीन मतदारांची नोंदणी, त्या प्रक्रियेत राजकीय पक्षांचा सहभाग, त्यावरील सुनावणीची पद्धत याबाबत निवडणूक आयोगाने 24 डिसेंबर 2024 रोजी आपल्या पक्षाच्या विधी, मानवाधिकार आणि आरटीआय विभागाचे वकील ओमर हूडा यांना सविस्तर 60 पानांचे पत्र पाठविले आहे, त्यात सर्व प्रश्नांचे निराकरण करण्यात आले आहे. ते आपल्यापर्यंत पोहोचले नसेल तर एकदा मागवून आवर्जून वाचावे, असे स्पष्ट उत्तर फडणवीस यांनी दिले.
नवीन मतदारांची आकडेवारी काय?
2014 ते 2019 या काळात : 63 लाख नवीन मतदार
2009 ते 2014 या काळात 75 लाख नवीन मतदार
2004 ते 2009 या काळात 1 कोटी नवीन मतदार
म्हणजे 2024 मध्ये काहीतरी दिव्य घडले, असे अजिबात नाही, असे फडणवीस म्हणाले. त्यांनी लोकसभा आणि विधानसभा या दोन निवडणुकांदरम्यान किती मतदार वाढले ही आकडेवारी सुद्धा दिली
2004 : लोकसभेपेक्षा विधानसभेत 5 टक्के अधिक
2009 मध्ये 4 टक्के अधिक
2014 मध्ये 3 टक्के अधिक
2019 मध्ये 1 टक्का अधिक
2024 मध्ये 4 टक्के अधिक आहे
त्यामुळे पुन्हा 2024 मध्ये काहीही नवीन घडले असे नाही
तिसरा टप्पा : अधिक मतदानाचा
दिवसभर झालेल्या एकूण मतदानाची टक्केवारी पाहिली तर प्रतितास सरासरी 5.83 टक्के इतके मतदान झाल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे शेवटच्या 1 तासात 7.83 टक्के इतकी वाढ झाली आहे, असे सांगून आपण काय नवीन सांगतो आहोत? सायंकाळी 5 ते 6 ही सुद्धा मतदानाची वेळ आहे आणि 6 पर्यंत बुथवर आलेल्या प्रत्येकाला मतदानाचा हक्क बजावता येतो, ही बाब राहुल गांधी माहिती नाही काय? असा सवाल फडणवीस यांनी केला.
फडणवीसांच्या कार्यालयाने एक वृत्तपत्रातील 3 डिसेंबर 2024 रोजी लिहिलेल्या लेखाचा संदर्भ त्यासाठी दिला आहे. 2024 च्या लोकसभेच्या दुसर्या टप्प्यात सायंकाळी 5 वाजता दिलेली मतदानाची आकडेवारी 60.96 टक्के इतकी, जी दुसर्या दिवशी 66.71 टक्के इतकी अंतिम झाली. यातील वाढ 5.75 टक्के इतकी पण, ती निवडणूक तुम्ही जिंकलात म्हणून लपवून ठेवणार का? असा बॉम्ब फडणवीस यांनी टाकला.
चौथा टप्पा : अर्धवटपणाचा
यात राहुल गांधी यांचे म्हणणे आहे की, केवळ 85 मतदारसंघात 12 हजार मतदान केंद्रांवर वाढीव मतदारांची संख्या होती आणि यापैकी बहुतेक जागा एनडीएच्या पारड्यात गेल्या. सायंकाळी 6 नंतर झालेले मतदान हे 17 लाख 70 हजार 867 इतके आहे. दिवसभराच्या मतदानाच्या सरासरीनुसार, 1 लाख 427 मतदान केंद्रावर प्रति मिनिट 97,103.32 इतके मतदान झाले आहे. त्यामुळे जे मतदान सायं. 6 नंतर झाले आहे, त्याची सरासरी काढली तर अतिरिक्त लागलेला वेळ हा केवळ 18 मिनिटे 23 सेकंद इतका आहे, अशी अकडेमोड या लेखात करण्यात आली आहे.
ज्या मतदारसंघात शेवटच्या क्षणी मतदार टक्केवारीत वाढ झाली तेथे एनडीएच जिंकली, हे तर आणखी हास्यास्पद आहे. कामठीचे उदाहरण त्यांनी दिले. पण जे उदाहरण त्यांनी दिले नाही, ते मी येथे देतो आहे. माढ्यात 18 टक्के वाढ दिसते. जेथे शरद पवार गटाचा उमेदवार जिंकला आहे. वणीत 13 टक्के वाढ आहे, जेथे उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार जिंकला आहे. श्रीरामपूर येथे 12 टक्के वाढ जेथे काँग्रेस जिंकली आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
पाचवा मुद्दा : हा मुद्दाच अर्थहीन
राहुल गांधी हे सातत्याने लोकशाही प्रक्रियेचा अपमान करतात. सातत्याने जनादेशाचा अपमान करतात. जनतेने राहुल गांधींना नाकारले, त्याचा बदला म्हणून ते जनतेला नाकारत आहेत. यातून काँग्रेस पक्ष आणखी गर्तेत जाणार, असे फटकारे फडणवीस यांनी लेखातून लगावले. आपल्याच पक्षाचे आमदार राहुल गांधी यांची एक दिवसात भेट घेऊन दाखवा, अशी विधाने का करतात? यावर त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
सातत्याने लोकशाही प्रक्रियेवर आणि संवैधानिक संस्थांवर शंका उपस्थित करुन आपण देशाला कोणत्या दिशेने घेऊन जात आहोत, कोणते विष कालवत आहोत, याचे भान ठेवले पाहिजे. महाराष्ट्रात झालेला पराभव हा किती जिव्हारी लागला, याची मला जाणीव आहे. पण, सातत्याने महाराष्ट्रातील शेतकर्यांचा, लाडक्या बहिणींचा, सामान्यजनांचा आणि इतरही नागरिकांच्या कौलाचा तुम्ही असा अपमान करणार असाल, तर महाराष्ट्रातील जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही. महाराष्ट्रातील जनतेच्या या अपमानाचा, मुख्यमंत्री या नात्याने त्यांचा सेवक म्हणून मी याचा कायमच निषेधच करीन, असा लेखाचा समारोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.