चंद्रावर वस्ती होईल तेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल : सुधीर मुनगंटीवार

प्रतिनिधी, मुंबई : केंद्रातील सरकार स्थापन झाल्यानंतर आता राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि त्यात आपल्याला संधी मिळेल अशी आशा राज्यातील महायुतीच्या आमदारांना असताना चंद्रावर वस्ती होईल, तेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असे मिश्किल वक्तव्य वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी केले. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. असे असले तरी त्यांच्या या वक्तव्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुकांच्या पोटात मात्र त्यांनी एकप्रकारे गोळाच आणण्याचे काम केले आहे.

केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या मंत्र्यांचा शपथविधी संपन्न झाल्यानंतर आता महाराष्ट्रात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा रंगली आहे. येत्या २७ जूनपासून राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वीच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडेल, अशी माहिती आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी सुधीर मुनगंटीवार यांना प्रश्न विचारला. यावर जेव्हा चंद्रावर वस्ती होईल, तेव्हा विस्तार होईल असे मुनगंटीवार म्हणाले. माध्यमांनी आतापर्यंत दहावेळा विस्तार केला आहे, असेही ते म्हणाले.
Cabinet Expansion: विधानसभा तोंडावर, नाराजांची संख्या वाढली, एकनाथ शिंदे यांनी उपाय शोधला, अजितदादांसमोरच विस्ताराचे संकेत

सत्तेच्या स्वार्थासाठी समाजात विष कालावण्याचे काम उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात झाले. देशभावनेसाठी काम केले पाहिजे. समाजात आम्ही जातीसाठी काम करत नाही. समाजात उद्रेक होता कामा नये, विरोधकांनी कायम जातीपातीचे राजकारण केल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या निकालांबाबत मुख्यमंत्री, दोन्ही उपुख्यमंत्री एकत्र बसणार आहेत. जे विश्लेषण केले त्यावर हे तिन्ही नेते चर्चा करतील. त्यानंतर विधानसभेची तयारी करतील असेही ते म्हणाले. भाजपला खरेच अनुसूचित जातीची मते कमी मिळाली का हे बघावे लागेल, असेही ते म्हणाले. काही राज्यात आम्ही मागे पडलो हे मान्य असल्याचेही मुनगंटीवर यांनी सांगितले.


दिल्लीतील शपथविधी सोहळ्याला राज ठाकरेंना निमंत्रण नसल्याबाबतही मुनंटीवार यांनी भाष्य केले. राज ठाकरेंना निमंत्रण नव्हते, असे बाळा नांदगावकर यांनी सांगितले. हे वरिष्ठांच्या कानावर टाकले जाईल. घाईगडबडीत निमंत्रण देण्याचे राहिले असेल, अजून कोणतेही कारण नाही. काहींना निमंत्रण जात नाही, मात्र याची नोंद केंद्रीय पक्षाने घेतली पाहिजे असेही ते म्हणाले.