चंद्रकांत पाटील-ठाकरे भेट; अभिनंदनानं भुवया उंचावल्या, उद्धव म्हणाले, असंच प्रेम राहू द्या!

मुंबई: लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर आणि विधानसभेचं अधिवेशन सुरु झालेलं असताना भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची विधिमंडळात भेट झाली. यावेळी दोन्ही नेते हसतखेळत एकमेकांशी बोलले. त्यांच्यात काही मिनिटांसाठी संवाद झाला. तुमचं असंच प्रेम कायम राहू द्या, असं उद्धव ठाकरे मंत्री चंद्रकांत पाटील यांना म्हणाले. या भेटीची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

मंत्री चंद्रकांत पाटील विधिमंडळातील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या भेटीला त्यांच्या केबिनमध्ये पोहोचले. त्यावेळी तिथे उद्धव ठाकरेंसह त्यांच्या पक्षाचे आमदार उपस्थित होते. यावेळी पाटील यांनी दानवेंना पुष्पगुच्छ दिला. विशेष म्हणजे यावेळी पाटलांनी ठाकरे गटाच्या अनिल परब यांचं अभिनंदन केलं. कालच पदवीधरची निवडणूक झाली. त्यात परब उमेदवार होते. विशेष म्हणजे यात परबांसमोर भाजपचा उमेदवार होता. पाटील यांनी परब यांचं ऍडव्हान्समध्ये अभिनंदन केलं. त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या.
Chandrakant Patil : अजितदादांवर चिडून कॅबिनेट बैठकीतून काढता पाय? चंद्रकांत पाटील म्हणतात अर्थ विभागाने म्हणे…
संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दानवेंच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. पाटील यांनी दानवेंसाठी चॉकलेट आणलं होतं. यावेळी दानवेंनी पाटलांना पेढा दिला. आम्ही लोकसभेला ३१ जागा जिंकल्या. त्यामुळे पेढे वाटतोय, असं दानवे म्हणाले. पाटील यांनी पेढा घेतला. त्यावर असंच प्रेम कायम राहू द्या, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. बसा आमच्यासोबत, गप्पा मारुया, असा आग्रह ठाकरेंनी केला. पण पाटील यांचे पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यानं ते तिथून निघून गेले.

चंद्रकांत पाटील केबिनमधून निघत असताना दानवेंनी त्यांना चॉकलेटची आठवण करुन दिली. दादा, माझं चॉकलेट राहिलं, असं दानवे म्हणताच केबिनमध्ये एकच हशा पिकला. पाटील यांनी दानवेंना चॉकलेट दिलं आणि तिथून निघाले. लोकसभा निवडणुकीतील प्रचारामुळे राज्यातील वातावरण तापलं होतं. नेत्यांनी एकमेकांवर जोरदार टीका केली होती. पण या भेटीत हलकंफुलकं वातावरण पाहायला मिळालं.