चंद्रकांत पाटलांना हवंय देवेंद्र फडणवीसांचं पद? थेट म्हणाले, सर्व मंत्रिपदं भूषवली आता फक्त…

Chandrakant Patil : भाजपाचे नेते तथा उच्च व तंत्रिशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंत्रिपदाबाबत मोठं विधान केलं आहे. महाराष्ट्रात माझं फक्त गृहखातंच राहिलं आहे. बाकी सगळी खाती माझी झाली, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय.

तासगावमध्ये बोलत होते चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील तासगावमध्ये शिवेनारी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. या सांस्कृतिक मंडळातर्फे दुर्गामाता मंदीर उभारण्यात आले आहे. याच मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी गृहमंत्रिपदावर भाष्य केलं. तसेच महिलांच्या आजाराच्यासंदर्भात एक मोफत रुग्णालय उभारलं जाईल, असे आश्वासन देखील यावेळी त्यांनी दिले.

चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले?

चंद्रकांत पाटील भाषण करत होते. भाषणादरम्यान त्यांनी महिलांच्या सर्व आजारांवर मोफत उपचार करणारे एक रुग्णालय उभारले जाईल, असे चंद्रकांत पाटलांनी सांगितले. तसेच जिजामातांच्या नावाने महिलांच्या आजारासंबंधीचे एक क्लिनिक उभारले जाईल. यात रक्ततपासणी मोफत, इंजेक्शन मोफत, औषधं, प्रसूती, शस्त्रक्रिया असं सगळं मोफत केलं जाईल, असेही चंद्रकांत पटालांनी सांगितलं.

महाराष्ट्रात फक्त गृहखातं राहिलं बाकी…

तसेच पुढे बोलताना ही काही सरकारी योजना नाही. सरकारी योजना वेगळ्या आहेत. मी मंत्री आहे. एक वरिष्ठ मंत्री आहे. महाराष्ट्रात फक्त गृहखातं राहिलं, बाकी सर्व खाती झाली, असे भाष्य चंद्रकांत पाटील यांनी केले.

मी माझ्या खिशात हात घालणार की नाही?

मी मंत्री आहे, तरीही माझी अशी धारणा आहे की, आयजीच्या जीवावर बायजी उधार असं कशाला हवं. सरकारच्या योजना मी कशाला चालवायच्या. सरकार त्या योजना चालवेल. पण मग मी काय करणार? मी माझ्या खिशात हात घालणार की नाही? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळेच सध्या एकच योजना सांगितली. महिलांनी एकत्र येऊन नव्या-नव्या गोष्टी समोर आणाव्यात, असे आवाहनही चंद्रकांत पाटलांनी केली.

आपली तरुणाई जपली नाही तर…

“महिलांना उपयोगी पडणारे उपक्रम मंडळाने करावेत. व्यसनी तरुणाला तुमच्या मंडळाचे सदस्य ठेवू नका. तंबाखू खाणाऱ्यालाही घेऊ नका. काही देशातील तरूण पिढी उद्ध्वस्त झाली. त्या देशांची लोकसंख्या कमी होतेय. तो देश चालवायला भारतीय तरुणं लागतात. जर्मनीने महाराष्ट्राला चार लाख पोरं मागितली आहेत. आपण 10 हजार तरुण पाठवले आहेत. बाकीची पाठवली आहेत. आगामी काळात आपली तरुणाई जपली नाही, तर अशीच स्थिती होईल,” अशी भीती चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केली.

नेमकी चर्चा काय रंगली?

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या या विधानाची आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. चंद्रकांत पाटलांनी गृहमंत्री पदाबाबत असणारी अपेक्षा आपोआप बोलून दाखवल्याची चर्चा सुरू झाली आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)