गैरसमज झाला! भूखंड घोटाळ्यात वायकरांना दिलासा; सोमय्यांच्या यादीतील आणखी एक नेता ‘स्वच्छ’

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत गेलेल्या रविंद्र वायकरांना आता मुंबई पोलिसांनी मोठा दिलासा दिला आहे. जोगेश्वरीतील भूखंड घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं वायकरांना क्लीन चिट दिली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी वायकर उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदेसेनेत गेले. पक्षांतर करा, अन्यथा तुरुंगात जा, असे दोनच पर्याय माझ्यासमोर होते, असं वायकरांनी महाराष्ट्र टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. पक्षांतर केलेल्या वायकरांची तुरुंगवारी टळणार असल्याचं सध्याच्या घडामोडींवरुन दिसत आहे.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना रविंद्र वायकर यांच्यावर जोगेश्वरीतील भूखंड प्रकरणात गैरव्यवहाराचे आरोप झाले. सार्वजनिक वापरासाठीचा राखीव भूखंड लाटून त्यावर पंचतारांकित हॉटेल बांधण्याचा घाट घालून ५०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. या प्रकरणात आझाद मैदान पोलीस ठाण्यात रविंद्र वायकर, त्यांच्या पत्नी मनिषा, व्यावसायिक भागीदार आसू मेहलानी, राज लालचंदानी, प्रितपाल बिंद्रा, आर्किटेक्ट अरुण दुबे यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल झाला.
MLC Election 2024: विधान परिषद निवडणुकीत कोणाचा गेम? क्रॉस व्होटिंगचा धोका, ‘त्या’ तिघांची नाराजी महागात पडणार?
राज्यातलं ठाकरे सरकार कोसळल्यानंतर वायकर उद्धव ठाकरेंसोबतच राहिले. त्यानंतर त्यांच्याविरोधातील कारवाईचा फास आवळला गेला. प्रकरण ५०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचं असल्यानं तपास मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे गेला. त्यामुळे वायकरांचा पाय खोलात सापडला. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वायकरांनी पक्षांतर केलं. ते शिंदेगटात गेले. त्यांना वायव्य मुंबई मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. ते निवडून आले, खासदार झाले. त्यानंतर आता त्यांना कथित भूखंड घोटाळा प्रकरणात दिलासा मिळाला आहे.

आर्थिक गुन्हे शाखेनं वायकरांना क्लीन चिट दिली आहे. मुंबई महानगरपालिकेनं वायकर यांच्याविरोधात गैरसमजातून गुन्हा दाखल केला असल्याचं आर्थिक गुन्हे शाखेनं प्री समरी रिपोर्टमध्ये नमूद केलं आहे. हा रिपोर्ट कोर्टात सादर करण्यात आलेला आहे. मुंबई पोलिसांनी वायकरांविरोधात दाखल केलेले गुन्हे मागे घेतले आहेत. ‘वायकरांविरोधात करण्यात आलेल्या आरोपांमध्ये कोणतंही तथ्य आढळलं नाही. गैरसमजातून, चुकीच्या माहितीवरुन या प्रकरणात मुंबई महापालिकेन त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला,’ असा निष्कर्ष आर्थिक गुन्हे शाखेनं काढला आहे. तसा उल्लेख त्यांनी प्री समरी रिपोर्टमध्ये केला आहे. त्यामुळे वायकरांना दिलासा मिळाला आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेला आणखी एक नेता स्वच्छ निघालेला आहे. भाजपसोबत गेल्यावर वायकरांना क्लीन चिट मिळाली असा योगायोग वायकरांसोबत घडला आहे.