गेल्या तीस वर्षांत वायूप्रदूषणामुळे सूर्यकिरणांचा प्रभाव कमी, सौरऊर्जा निर्मितीवर परिणाम

प्रतिनिधी, पुणे : ‘वातावरणातील वाढते धूलिकण, वायू प्रदूषण आणि वर्षभरातील ढगाळ दिवस वाढल्याने सूर्य किरणांचा प्रभाव कमी होत असून, त्याचा परिणाम सौरऊर्जा निर्मितीवर होऊ शकतो,’ असे निरीक्षण भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) शोधनिबंधातून पुढे आला आहे. गेल्या तीस वर्षांत सूर्याच्या किरणांच्या तीव्रतेत घट झाली असल्याचे अभ्यासात स्पष्ट झाले आहे.‘आयएमडीए’चे शास्त्रज्ञ बी. एल. सुदीपकुमार, राजनकुमार फुकान, राजा बोरागापू, सी. बी. नलगे, ए. डी. तथे आणि भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) क्लायमेट रिसर्च अँड सर्व्हिेसेसचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांच्या गटाने हा अभ्यास केला असून, ‘आयएमडी’च्या जर्नलमध्ये तो प्रकाशित करण्यात आला आहे. सौरऊर्जा निर्मिती क्षेत्रात आखल्या जाणाऱ्या धोरणांच्या पार्श्वभूमीवर ‘हवामानशास्त्र आणि कालनिहाय सूर्य किरणांच्या प्रभावावर झालेले बदल’ या विषयाचा तौलनिक अभ्यास करून संशोधकांनी भविष्यातील प्रवाहांचे प्राथमिक अंदाज मांडले आहेत.
रिफायनरीचा विषय बंद होईपर्यंत आंदोलन चालूच, बारसु रिफायनरीविरोधकांची स्पष्ट भूमिका
‘देशात गेल्या तीन दशकांमध्ये बांधकाम क्षेत्राचा प्रचंड विस्तार झाला असून, यासाठी मोठ्या प्रमाणात जंगलतोड, वृक्षतोड झाली आहे. मोठ्या प्रमाणात जमिनीची धूप होते आहे. परिणामी हवेतील सूक्ष्म, अतिसूक्ष्म धूलिकणांसह प्रदूषकांचे प्रमाण वाढले आहे. अवेळी येणारा पाऊस, ढगाळ वातावरणाचे दिवसही वाढले आहे. या सगळ्या घटकांचा विपरित परिणाम म्हणजे सूर्याच्या किरणांचा प्रभाव कमी होतो आहे,’ अशी माहिती संशोधक बी. एल. सुदीपकुमार यांनी दिली.

‘वातावरणातील या घडामोडींमुळे आगामी काळातही सूर्याच्या किरणांचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अडथळा ठरणाऱ्या घटकांवर मार्ग काढणे हा एक पर्याय ठरू शकतो; तसेच सौरऊर्जा निर्मिती क्षेत्रातील संशोधक, तज्ज्ञांनी अधिक क्षमतेचे, प्रभावी सौर पॅनेल तयार करायला हवेत किंवा सौर पॅनेलची संख्या वाढवावी लागेल. या संशोधन अहवालाचा सौरऊर्जा प्रकल्पांचे ठिकाण निश्चित करण्यासाठी, नियोजनासाठी उपयोग होणार आहे,’ असे सुदीपकुमार यांनी सांगितले.

‘निरीक्षणांच्या संशोधनास उपयोग’

‘देशभरात अपारंपरिक ऊर्जेकडे शाश्वत पर्याय म्हणून बघितले जाते आहे. सौरऊर्जा निर्मिती हा यातील प्रमुख पर्याय असून, आगामी काळात राज्यनिहाय अनेक प्रकल्प उभे राहणार आहेत. प्रकल्पांचे नियोजन, जागा निश्चित करण्यासाठी आवश्यक असलेली मूलभूत शास्त्रीय माहिती या संशोधनातून उपलब्ध झाली आहे. अभ्यासातून मिळालेल्या निरीक्षणांच्या आधारे आगामी काळातील संशोधन, धोरणनिर्मितीच्या नियोजनास उपयोग होणार आहे,’ अशी माहिती कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.