गाडीवर ठाकरे गटाचं निवडणूक चिन्ह लावणं महागात, संजोग वाघेरेंविरुद्ध निवडणूक आयोगात तक्रार

प्रशांत श्रीमंदिलकर, पिंपरी : मतदानाच्या दिवशी उमेदवारांना गाडीवर पक्षाचा झेंडा अथवा पक्षाचे निवडणूक चिन्ह लावण्यास मनाई असते. तरीही मावळ लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतर्फे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे हे कारवर त्यांचे ‘मशाल’ हे निवडणूक चिन्ह लावून फिरत असल्याचे आढळून आले आहे. यासंदर्भात महायुतीतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे हे कारवर मशाल या निवडणूक चिन्हाचे स्टिकर लावून मतदारसंघातील विविध मतदान केंद्रांना भेटी देत आहेत. हा मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न असून निवडणूक आचारसंहितेचा उघड- उघड भंग आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्या कार्यालयात देण्यात आलेल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे.

कोण आहेत संजोग वाघेरे?

संजोग वाघेरे यांची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसकडून झाली. त्यांचे वडील भिकू भिमाजी वाघेरे पाटील हे पिंपरी गावाचे सरपंच होते. पिंपरी चिंचवडच्या राजकारणात वाघेरे कुटुंबाचे नाव सन्मानाने घेतले जाते. गेल्या ४० वर्षांपासून संजोग वाघेरे हे पिंपरी-चिंचवडच्या राजकारण सक्रिय आहेत.
Ashok Pawar : अजितदादा म्हणाले, तू निवडून कसा येतो, तेच बघतो; ‘साहेब’ समर्थक नेता म्हणतो, स्वार्थासाठी पक्ष…
अजित पवार यांचे खंदे समर्थक म्हणून वाघेरे यांची ओळख आहे. त्यांनी नगरसेवकपदापासून सुरू केलेल्या प्रवासात महापौर, पीसीएमटीचे सभापती, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्षपद असे अनेक टप्पे आहेत.

४० वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसशी एकनिष्ठ असणाऱ्या संजोग वाघेरे यांनी डिसेंबर २०२३ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवेसेनेत प्रवेश केला. डिसेंबरमध्ये संजोग वाघेरे हे ठाकरे गटात आले असले तरी निवडणूक लढण्याची तयारी त्यांनी खूप आधीपासूनच सुरू केली होती.
Beed Journalist Death : निवडणूक वार्तांकनावेळी हार्ट अटॅक, ठाणेकर पत्रकाराचा बीडमध्ये मृत्यूRead Latest Maharashtra News Updates And Marathi News

२०१४ आणि २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना संजोग वाघेरे यांना लोकसभेची निवडणूक लढवायची होती. मात्र, मावळ लोकसभेसाठी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना मावळ लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांना आपली ही इच्छा मनातच ठेवावी लागली होती. मात्र यंदा त्यांनी निवडणूक लढवण्याचे निश्चित केले होते. राष्ट्रवादीत फूट पडल्याने तिकीट मिळण्याबाबत साशंकता निर्माण झाली. त्यामुळे त्यांनी ठाकरे गटात प्रवेश करत मावळ लोकसभेचे तिकीट मिळवले.